कोठडीत कावरेवासियांची अन्नपाण्याविना तडफड
By admin | Published: May 11, 2014 12:48 AM2014-05-11T00:48:30+5:302014-05-11T00:51:26+5:30
पणजी : कावरे-पिर्ला येथे अचानक सुरू झालेल्या खनिज वाहतुकीविरुद्ध दंड थोपटले म्हणून कावरे-पिर्ला भागातील अनुसूचित जमातीतील लोकांना शासकीय यंत्रणेने लक्ष्य बनविले.
पणजी : कावरे-पिर्ला येथे अचानक सुरू झालेल्या खनिज वाहतुकीविरुद्ध दंड थोपटले म्हणून कावरे-पिर्ला भागातील अनुसूचित जमातीतील लोकांना शासकीय यंत्रणेने लक्ष्य बनविले. युवक, महिला व वृद्धांना पकडून प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली व त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन कोठड्यांमध्ये ठेवले गेले. ‘तिथे प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशी स्थिती. जमिनीला पोट टेकवून कोठडीत झोपायची वेळ गुजरली,’ अशा शब्दांत कावरेचे पंच सदस्य तथा आंदोलक रवींद्र वेळीप व अन्य ग्रामस्थांनी आपली व्यथा शनिवारी पणजीतील पत्रकारांसमोर मांडली. सकाळी अकरा वाजता आम्हाला अटक करून पोलीस स्थानकावर आणण्यात आले होते. त्या वेळेपासून दुसर्या दिवसापर्यंत आम्हाला पिण्यासाठी पाणी, चहा, जेवण काहीच मिळाले नाही. सगळेच उपाशी. अंगात त्राण नाही, अशी स्थिती अनेकांच्या वाट्याला आली. मात्र, पोलीस यंत्रणेला, उपजिल्हाधिकार्यांना, स्थानिक आमदारांना व एकूणच सरकारला आमची पर्वा नाही. सरकारला फक्त खाण व्यावसायिकांची पर्वा आहे, असे वेळीप म्हणाले. ‘बॉण्डवर सही करा व चला,’ असे दुसर्या दिवशी उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी सांगत होते. आम्ही बॉण्डवर सही करण्यास नकार दिला. पोलिसांनी आम्हाला उपजिल्हाधिकार्यांसमोर नेले आणि मग पोलीस अधिकारी गायबच झाले. आम्ही अजूनही पोलिसांच्या अटकेत असल्यासारखी स्थिती आहे; कारण आम्ही बॉण्डवर सही केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचे कलम तुम्हाला लावू, असे उपजिल्हाधिकारी पंचवाडकर आम्हाला सांगतात, असे वेळीप म्हणाले. यापूर्वी जे लोक बेकायदा व्यवसायात होते, तेच आता कावरे-पिर्ला येथे पुन्हा बेकायदा खनिज धंदा करू पाहात आहेत. आम्ही खाण व्यवसायाच्या विरोधात नाही; पण आम्ही भूमिपुत्र असल्याने आमच्या गावात काय चालले आहे, ते आम्हाला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. शासकीय यंत्रणा आम्हाला अंधारात ठेवून जबरदस्तीने खनिज वाहतूक करत आहे. आमच्या गावात ४० जणांकडे ट्रक आहेत; पण यातील एकही ट्रक खनिज वाहतुकीसाठी घेतला जात नाही. आमदार सुभाष फळदेसाई यांच्या भावाचा मुलगा आपण सध्याच्या खनिज वाहतुकीसाठी कंत्राटदार असल्याचे सांगतो, असे रवींद्र वेळीप व इतर ग्रामस्थांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)