भयभीत गावकऱ्यांना पोलिसांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:50 PM2019-01-24T23:50:18+5:302019-01-24T23:51:25+5:30

नक्षलवाद्यांनी २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर येथील तीन निष्पाप आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षल्यांच्या भीतीपोटी धास्तावलेल्या कसनासूर येथील नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राचा आश्रय घेतला.

The police console the fearful villagers | भयभीत गावकऱ्यांना पोलिसांचा दिलासा

भयभीत गावकऱ्यांना पोलिसांचा दिलासा

Next
ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाºयांची भेट : कुटुंबीयांना आर्थिक मदत देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : नक्षलवाद्यांनी २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर येथील तीन निष्पाप आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षल्यांच्या भीतीपोटी धास्तावलेल्या कसनासूर येथील नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राचा आश्रय घेतला. गेल्या तीन दिवसांपासून नागरिक मदत केंद्राच्या परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरूवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात जाऊन या नागरिकांशी संवाद साधला. नक्षल्यांना घाबरण्याचे कारण नाही, पोलीस विभाग आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा दिलासा यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला.
गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात गुरूवारी (दि.२४) भेट देऊन कसनासूरच्या नागरिकांची भेट घेतली. नक्षल्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना दिलासा दिला.
२२ एप्रिल २०१८ रोजी बोरीया कसनासूर येथे झालेल्या नक्षल घटनेचा व कसनासूर गावातील तीन व्यक्तींच्या हत्येच्या घटनेशी काहीही संबंध नाही, असा खुलासा वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी यावेळी केला.
पोलीस जनतेची मदत करायला कधीही सक्षम आहेत. नक्षलवादी आदिवासींचे शोषण करीत आहेत. नक्षलवाद्यांमुळे आदिवासी भागातील विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. आम्ही तुमच्या अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
नक्षल चळवळीमध्ये सामिल झालेल्या लोकांना विविध प्रकारच्या योजना राबवून त्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले. यापुढेही तसा प्रयत्न सुरू राहिल. आम्ही आदिवासींचे कदापी शोषण होऊ देणार नाही. नक्षलग्रस्त भागातील विकासकामे पूर्ण करणार, असे अभिवचनही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी समीर दाभाडे, सीआरपीएफचे सहायक कमांडंट राहुल नामदे होते. पोलीस उपनिरिक्षक पुनम गोरे, एसआरपीएफचे पीएसआय शिंदे, महसूल मंडळ अधिकारी गड्डमवार आदी उपस्थित होते.

आज गावकरी स्वगावी परतणार
तिघांच्या हत्येनंतर गेल्या तीन दिवसांपासून ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला आलेले बहुतांश गावकरी पोलिसांच्या दिलाशानंतर शुक्रवारी स्वगावी कसनासूरला जाणार आहेत. पीडित तीन कुटुंबाना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे. तसेच गावात न जाता इतरत्र जाऊ इच्छिणाºयांनाही पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जाणार आहे. मृत रैनू मडावीच्या पत्नीला कंत्राटी नोकरी देणार असल्याचे यावेळी डीआयजी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: The police console the fearful villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.