उद्योगक्रांतीच्या सोंगातून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:14 PM2018-01-29T22:14:35+5:302018-01-29T22:15:09+5:30

मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही.

Misleading by the sound of industrial revolution | उद्योगक्रांतीच्या सोंगातून दिशाभूल

उद्योगक्रांतीच्या सोंगातून दिशाभूल

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्ह्यात नवीन काम दाखवा अन् बक्षीस मिळवा

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही. आता उद्योग क्रांती यात्रेचे सोंग घेऊन गडचिरोलीचे आमदार नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केला. या यात्रेतून ते काय साध्य करीत आहे ते त्यांनाच माहीत, प्रत्यक्षात ही उद्योग यात्रा आहे की वसुली उद्योग यात्रा? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
सरकारने वाढवून ठेवलेली महागाई आणि निष्क्रीय कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी डॉ.उसेंडी यांनी सोमवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, स्थानिक आमदार १०० दिवसात १०० उद्योग उभारणार होते. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा किती उद्योग उभारले याचा हिशेब त्यांनी द्यावा. जिल्ह्यात या सरकारच्या काळात झालेले एकही नवीन काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आव्हानच त्यांनी राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून दिले.
वास्तविक पाहता आमच्या कार्यकाळात सुरू झालेले उद्योगही टिकवणे त्यांना कठीण जात आहे. मुद्रा योजनेतून बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज दिले जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकºयांचे चुकीचे पंचनामे करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात कीडीने पिकांचे नुकसान झाले असताना पीक विमा योजनेचा लाभ दिला नाही. ही योजना शेतकºयांसाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी? असा सवाल उसेंडी यांनी केला. जनधनच्या नावावर सर्वांचे बँक खाते उघडले. पण खात्यात कमी पैसे ठेवले तर खातेधारकाला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. गोरगरीबांचे कष्टाचे पैसे कपात करून शासनाची तिजोरी भरण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. ज्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकविला नाही ते लोक आता तिरंगा यात्रा काढत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सरकार विविध क्लुप्त्या लढवत आहेत, असाही आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला. पत्रपरिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी हसनअली गिलाणी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, रजनिकांत मोटघरे, पी.टी.मसराम, शंकर सालोडकर, कुणाल पेंदोरकर व इतर उपस्थित होते.
महागाईविरोधात उद्या सायकल रॅली
ज्यावर पेट्रोलचे दर ठरतात त्या कच्च्या तेलाच्या किमती २०१४ च्या तुलनेत निम्म्याने कमी झाल्या आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे होण्याऐवजी पेट्रोल ६७ रुपयांवरून ८१ रुपये करण्यात आले. यामुळे इतर वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. गॅस ८१० रुपयांना घ्यावा लागत आहे. ही सामान्य नागरिकांची लूट आहे. या किमती कमी करण्यासाठी आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ३१ जानेवारीला जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर काँग्रेसकडून सायकल रॅली काढली जाणार असल्याचे डॉ.उसेंडी यांनी सांगितले.

Web Title: Misleading by the sound of industrial revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.