रानडुकरांच्या शिकारप्रकरणी कसारीतील १६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 07:53 PM2019-05-21T19:53:50+5:302019-05-21T19:54:00+5:30
तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणा-या कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वनविभागाने अटक केली.
कोरेगाव चोप (गडचिरोली) : तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणा-या कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वनविभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले. कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी हा त्याच्या शेतात तारांत विद्युत प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करतो, अशी गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे वनविभागाच्या कर्मचा-यांनी १९ मे रोजी मडावी याच्या शेतात जाऊन तपासणी केली.
तिथे तार आढळून आले. शिकारीबाबत विचारले असता, त्याने सुरुवातीला नकार दिला. मात्र वन विभागाच्या कर्मचा-यांना मडावीवर संशय असल्याने त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपण वन्यजीवांची शिकार करीत असल्याचे मान्य केले. पुन्हा त्याच्या शेताची तपासणी केली असता, तणसाच्या ढिगात तीन रानडुकरांचे मुंडके व एक रानकुत्रा कुजलेल्या स्थितीत आढळून आला.
वनविभागाच्या कर्मचा-यांनी अधिक चौकशी केल्यानंतर कसारी येथील ज्या नागरिकांना मांस विकले, अशा १५ व्यक्तींची नावे मडावी याने सांगितली. त्यामुळे वन कर्मचा-यांनी त्या १५ नागरिकांनाही अटक केली. मडावीसह इतर १५ व्यक्तींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने इतर १५ आरोपींची जामिनावर सुटका केली तर मडावी याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी एस. जी. कैदलवार, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे यांच्यासह वन कर्मचा-यांनी केली.