कोणता झेंडा घेऊ हाती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 04:32 PM2019-07-12T16:32:18+5:302019-07-12T16:34:04+5:30

अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय

Which flag to take? | कोणता झेंडा घेऊ हाती?

कोणता झेंडा घेऊ हाती?

Next

मिलिंद कुलकर्णी
यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली. त्यातील एक वैशिष्टय म्हणजे अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय असे काही ठिकाणी दिसून आले. डॉ.सुजय विखे, डॉ.अमोल कोल्हे ही काही ठळक उदाहरणे आहेत. पालघरचा पॅटर्न तर अनोखा म्हणावा लागेल. अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत एकमेकांविरुध्द लढलेल्या भाजप-सेनेने सार्वत्रिक निवडणुकीत मावळत्या भाजप खासदाराला शिवसेनेची उमेदवारी निवडून आणले. पक्ष, चिन्ह, निष्ठा, कामगिरी या तत्त्व आणि गुणांना निवडणुकांमध्ये काही महत्त्व आहे की नाही, असे वाटावे, अशा या घटना आहेत. सामान्य मतदारांसोबतच राजकीय नेते, अभ्यासक, तज्ज्ञ हे सारे यामुळे चक्रावले आहेत.
लोकसभा निवडणुकीतील या साऱ्या प्रकाराचा मोठा प्रभाव आणि परिणाम आॅक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीत पडण्याची दाट शक्यता आहे. राजकीय मंडळींना हवेचा अंदाज खूप लवकर येतो, असे म्हणतात. त्यादृष्टीने राजकीय पातळीवर हालचालींना वेग येत आहे. नंदुरबारातील विक्रमी खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का आहे. गावीत-नाईक म्हणजे नंदुरबारची काँग्रेस असे समीकरण असताना या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर माणिकराव गावीत नाराज झाले होते. मुंबईत जाऊन त्यांनी प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातील उमेदवारीवरुन धुसफूस सुरु आहे. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक किंवा त्यांचे सुपूत्र साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक हे उमेदवारीचे दावेदार आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच गावीत यांनी भाजपची वाट चोखाळली. भरत गावीत हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे प्रतीक आहेत. हे वादळ आता राज्यभर अनेक काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांच्या घरांमध्ये घोंगावत आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची लाट असताना विरोधी पक्षात कशासाठी थांबायचे हा नव्या पिढीचा सवाल आहे. या प्रश्नामुळे साठीच्या घरातील दोन्ही काँग्रेसचे नेते त्रस्त आहेत. वाडवडिलांनी उभारलेल्या शैक्षणिक, सहकारी संस्था चालवित असताना अनेक अडचणींचे डोंगर समोर आहेत. भाजप-शिवसेनेचे सरकार केंद्र व राज्यात असताना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा अनुभव आहे. पक्षाने आतापर्यंत सगळे दिले असताना कठीण काळात पक्षाची साथ सोडायची इच्छा या नेत्यांची नाही. आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करु, एवढा संयम त्यांच्याकडे आहे. परंतु, नव्या पिढीकडे हा संयम नाही. डॉ.सुजय, डॉ.हीना, डॉ.सुभाष भामरे यांच्यासारखे यश त्यांना खुणावते आहे.
भारतीय राजकारणात अशी स्थित्यंतराची वेळ अनेकदा आली. काँग्रेसची अनेकदा शकले उडाली. समाजवादी किंवा जनता पक्षाची तीच गत झाली. आयाराम-गयाराम ही संस्कृती बनली. डावे, उजवे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव या विचारसरणीशी बांधील नेते आणि कार्यकर्तेदेखील दुर्मिळ झाले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारी संस्कृती वेगाने वाढत असल्याने विचार, तत्त्व गुंडाळून ठेवत ‘सत्ताधारी’ व्हायची सगळ्यांना घाई झाली आहे. समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यवहार ज्ञान ज्याच्याकडे उत्तम आहे, तो आताच्या राजकारणात यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे झेंडा कोणता हाती घेतला तर फायदा होईल, याचे जो तो समीकरण बनवून आडाखे बांधत असतो. ज्यांना हे जमत नाही, ते उगाच निष्ठा, तत्त्वाचा आग्रह अशा सबबी सांगत कुढत बसतात. कारण राजकारण इतके दूषित झाले आहे की, तेथे सज्जन, सुशील माणसे टिकून राहणे अवघड नव्हे तर अशक्य झालेले आहे. काळाचा महिमा असेच याचे वर्णन करावे लागेल.

Web Title: Which flag to take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.