समाज म्हणून आम्ही केव्हा प्रगल्भ होणार?

By रवी टाले | Published: October 23, 2018 08:19 PM2018-10-23T20:19:06+5:302018-10-23T20:19:15+5:30

एकीकडे जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याकडे आमची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे समाज म्हणून आम्ही अप्रगल्भ आहोत, ही वस्तुस्थितीही या दुर्घटनेने अधोरेखित केली आहे.

When will we progress as a society? | समाज म्हणून आम्ही केव्हा प्रगल्भ होणार?

समाज म्हणून आम्ही केव्हा प्रगल्भ होणार?

googlenewsNext

दसऱ्याच्या दिवशी अमृतसर येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताचे पडसाद अजूनही उमटत आहेत. रावण दहन कार्यक्रमाचा आनंद घेत असलेल्या सुमारे ६० जणांचा बळी घेतलेल्या त्या अपघात प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बुधवारी रेल्वे मंत्रालय आणि पंजाब सरकारला नोटीस जारी केल्या. रेल्वे मार्गावर ठाण मांडण्याचे जमावाचे कृत्य शहाणपणाचे नव्हतेच; पण त्या अत्यंत दुर्दैवी आणि भयावह अपघातास जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणाही कारणीभूत होताच, असे मानवाधिकार आयोगाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याने समाजात प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाविरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे; पण एकीकडे जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याकडे आमची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे समाज म्हणून आम्ही अप्रगल्भ आहोत, ही वस्तुस्थितीही या दुर्घटनेने अधोरेखित केली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आम्ही लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली. त्या प्रणालीने आम्हाला बहाल केलेले स्वातंत्र्य, अधिकार, हक्क आम्ही मनमुराद उपभोगतो; मात्र त्यासोबत येत असलेल्या जबाबदाºया पार पाडण्यात, कायद्यांचे, नियमांचे, शिस्तीचे पालन करण्यात आम्ही कसूर करतो. किंबहुना कायदा, नियम किंवा शिस्तीचे पालन करणे हा आम्ही मानभंग समजतो. स्वत:च्या किंवा कुटुंबीयाच्या, नातेवाइकाच्या, परिचिताच्या पदाचा, प्रतिष्ठेचा रोब दाखवून कायदा, नियम, शिस्त मोडणे हे आमच्या समाजात मोठेपणाचे लक्षण समजले जाते.
अमृतसर अपघातानंतर समाज माध्यमांमध्ये एक चित्रफित प्रसारित झाली. फाटक आणि चौकीदार नसलेल्या एका रेल्वे क्रॉसिंगवर एक रेल्वेगाडी थांबलेली आहे आणि लोक आपापली दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने दामटत रेल्वेमार्ग पार करीत आहेत. सतत वाजत असलेल्या रेल्वेगाडीच्या हॉर्नचा लोकांवर जराही परिणाम होत नाही. शेवटी रेल्वेगाडीच्या इंजीनमधून दोन कर्मचारी खाली उतरून बाबापुता करीत वाहनचालकांना रोखण्याचा प्रयत्न करतात आणि लोको पायलट अत्यंत हळूवार वेगाने गाडी समोर आणतो. तरीदेखील काही जण रेल्वे कर्मचाºयांशी वाद घालून रेल्वेमार्ग पार करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी कसेबसे रेल्वे इंजीन क्रॉसिंगच्या पुढे निघते आणि रेल्वे कर्मचारी त्यामध्ये बसल्यानंतर गाडीचा पुढील प्रवास सुरू होतो.
समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या उपरोल्लेखित चित्रफितीमधील चित्र देशभरातील प्रातिनिधिक वस्तुस्थिती आहे. ज्या ठिकाणी रेल्वे फाटक आहेत त्या ठिकाणी दुचाकी झुकवून फाटकाखालून पार करणारे दुचाकीचालक नित्य नजरेस पडतात. प्रातर्विधीसाठी रेल्वे रुळांचा वापर करणे हा तर रेल्वेमार्गांच्या आजूबाजूच्या गावांमधील, वस्त्यांमधील लोकांचा जणू काही जन्मसिद्ध हक्कच आहे. रात्रीचे जेवण झाल्यावर तंबाखू चघळत रुळांवर बसून गप्पा झोडणाºया लोकांचीही कमतरता नाही. अनधिकृत ठिकाणी रेल्वेमार्ग ओलांडणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे, हे बहुतांश लोकांच्या गावीही नसते. त्यामुळे या देशात अमृतसरसारखे रेल्वे अपघात घडतात यामध्ये काहीही नवल नाही. काही दिवस या अपघाताची चर्चा होईल, मग दुसरा कुठला तरी विषय समोर आला की या अपघाताचा विसर पडेल तो थेट दुसरा तसलाच अपघात होईपर्यंत!
अमृतसर येथील रेल्वे अपघातात एकाच वेळी सुमारे ६० लोकांचा बळी गेल्याने बरीच हळहळ व्यक्त होत आहे; पण एकट्या देशातील सर्वाधिक पुढारलेले शहर समजले जात असलेल्या मुंबईत जानेवारी २०१३ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत रूळ ओलांडताना तब्बल १८ हजार ४२३ लोक ठार झाले तर १८ हजार ८४७ लोक जखमी झाले. हे चित्र केवळ रेल्वे अपघातांचेच आहे असे नव्हे. रस्त्यांवर होणाºया अपघातांमध्ये ठार वा जखमी होणाºया लोकांची संख्या तर यापेक्षा किती तरी जास्त आहे. त्यामध्ये रस्त्यांची खराब अवस्था आणि चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेले रस्ते या घटकांचाही वाटा असला तरी सर्वाधिक दोष जातो तो बेशिस्त वाहनचालकांना! वाहतुकीचे कोणतेही नियम पाळायचे नाहीत असा जणू काही आम्ही प्रणच घेतला आहे. वाहतुकीची कोंडी झाल्यास कोंडी फुटण्याची प्रतीक्षा न करता ज्या लेनमधून वाहतूक सुरळीत सुरू आहे, त्या लेनमध्ये आपले वाहन घुसवून त्या लेनमध्येही कोंडी निर्माण करण्यात आमचा हातखंडा आहे. अनेकदा तर विरुद्ध बाजूच्या लेनमध्येही गाडी दामटण्याचा पराक्रम गाजविण्यात आम्हाला धन्यता वाटते. दुचाकीचा वापर करताना हेल्मेट धारण करणे आणि चारचाकी वाहनात सिटबेल्ट लावऊन बसणे हा आम्ही आमचा घोर अपमान समजतो आणि त्यासाठी वाहतूक पोलिसांनी हटकल्यास त्यांच्याशी वाद घालणे प्रतिष्ठेचे समजतो. अनेक महानुभाव आपल्या गाडीत किती एअरबॅग आहेत, त्यासाठी आपण किती जादा पैसे मोजले याच्या फुशारक्या मारत असतात; पण गाडीत बसताना कधीच सिटबेल्ट लावत नाहीत. दुर्दैवाने अपघात झालाच तर सिटबेल्ट लावलेला नसल्याने एअरबॅग उघडणारच नाहीत, हे त्यांच्या गावीही नसते!
नागरिक किंवा समाज म्हणून आमच्या जबाबदाºया पार पाडण्यात आम्ही सातत्याने अपयशी ठरतो आणि त्याचा परिपाक म्हणून अमृतसरसारखी दुर्घटना घडली की शासन, प्रशासन आणि व्यवस्थेला जबाबदार ठरविण्याचे काम इमानेइतबारे पार पाडतो. शासन, प्रशासनात काम करणारे लोक काही आकाशातून पडलेले नसतात. तेदेखील समाजाचेच घटक असतात. मग त्यांच्याकडून आमच्यापेक्षा वेगळ्या वर्तणुकीची कशी अपेक्षा करता येईल?
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो, कोणताही थोर नेता जसा वागतो तसे वागण्याचा प्रयत्न सर्वसामान्य जनता करते आणि तो नेता जे आदर्श प्रस्थापित करतो त्यांचे पालन जग करते. आमच्या देशाएवढे महापुरुष तर इतर कोणत्याही देशात जन्मास आले नाहीत; पण दुर्दैवाने आम्ही त्यापैकी एकाही महापुरुषाच्या पदचिन्हांवर चालत नाही. त्यामुळेच की काय हल्ली थोर नेते औषधालाही सापडत नाहीत. शेवटी नेतेही समाजातूनच येतात, आभाळातून पडत नाहीत. आडातच नाही, तर पोहºयात कुठून येणार? त्यामुळे केवळ शासन, प्रशासनावर आगपाखड करून काही होणार नाही. अमृतसरसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर समाजाला आणि म्हणजेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला अपरिहार्यरित्या स्वत:स बदलावे लागेल. एक प्रगल्भ नागरिक, एक प्रगल्भ समाज म्हणून स्वत:ला प्रस्थापित करावे लागेल. ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अमृतसरसारख्या दुर्घटना घडतच राहतील आणि जग आम्हाला हसतच राहील!

- रवी टाले

ravi.tale@lokmat.com

 

Web Title: When will we progress as a society?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला