आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:19 AM2018-10-13T03:19:39+5:302018-10-13T03:20:08+5:30

महाराष्ट्राचा आणि मूळचा मुंबईकर असलेल्या सुनीत जाधवने, अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखत नुकत्याच पुण्यात झालेल्या ५१ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत, ‘मिस्टर एशिया’ (आशिया श्री) किताब पटकावला.

Tricolor 23 years after the Asian Bodybuilding Tournament | आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा

googlenewsNext

- चेतन पाठारे । आयबीबीएफ (सरचिटणीस)

महाराष्ट्राचा आणि मूळचा मुंबईकर असलेल्या सुनीत जाधवने, अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखत नुकत्याच पुण्यात झालेल्या ५१ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत, ‘मिस्टर एशिया’ (आशिया श्री) किताब पटकावला. त्याचबरोबर भारतीय संघानेही शानदार कामगिरी करताना सांघिक जेतेपद पटकावत विक्रमी कामगिरी केली. विक्रमी कामगिरी यासाठी कारण, तब्बल २३ वर्षांनी भारताने या स्पर्धेत बाजी मारली. त्यामुळेच सुनीतने मिळवलेले जेतेपद भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे.
इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ)ला भारतीय सरकारकडून मान्यता आहे. आज या खेळात केलेल्या अनेक बदलांमुळे शरीरसौष्ठवकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, गेली कित्येक वर्षे भारतीय संघ विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होत आहे; पण आॅलिम्पिक खेळ नसल्याने भारतीय सरकारकडून अद्याप या खेळाला किंवा संघटनेला आर्थिक मदत मिळत नाही. २०१४ साली भारताने जागतिक स्पर्धेचे यजमानपद भूषविले. त्यानंतर आता ५२ व्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविताना भारताने तब्बल २३ वर्षांनी सांघिक जेतेपद पटकावले.
प्रेमचंद डोग्रा यांनी २३ वर्षांपूर्वी आशियाई जेतेपद पटकावले आणि त्यानंतर भारताने पुण्यात झालेल्या स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्यात वैयक्तिक पुरस्कार महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने पटकावला, ही सर्वात अभिमानाची गोष्ट. सुनीतने खूप चांगली कामगिरी केली. याआधीही अनेक जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचा पताका फडकलेला आहे. महेंद्र चव्हाण गेल्या वर्षी, तर नितीन म्हात्रेही दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता.
शरीरसौष्ठवपटूंसाठी काम करणारी ‘आयबीबीएफ’ भारतातील मान्यताप्राप्त एकमेव संस्था आहे. याआधी कोणत्याही स्पर्धेत खेळाडूंच्या आहारावर व त्यांच्या निवासव्यवस्थेवर कोणीच लक्ष दिले नव्हते; परंतु आयबीबीएफने या सर्व अडचणी दूर केल्या. याआधी खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था एखाद्या धर्मशाळेत व्हायची. शिवाय, त्यांचे जेवणही अगदी साधेपणाचे डाळ-भात असे असायचे. या सर्व गोष्टी आता बदलल्या. जर अधिकाऱ्यांना वातानुकूलित किंवा थ्री स्टार सेवा मिळते, तर खेळाडूंनाही अशी व्यवस्था अवश्य मिळाली पाहिजे, हा दृष्टिकोन ‘आयबीबीएफ’ने यशस्वी केला आहे. खेळाडूंना योग्य सुविधा मिळणे, ही या खेळाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेळाडूंना आवश्यक असलेला पोषक आहार उपलब्ध होत असून शरीरसौष्ठवचा दर्जा उंचावलेला आहे.
महाराष्ट्राच्या विचार करता आज राज्यात हा खेळ खूप रुजला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मान्यताप्राप्त संघटना असून, त्याद्वारे तळागाळातून प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची गणना अव्वल संघामध्ये होते व यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भरणा अधिक आहे. देशातील सर्वोत्तम संघ म्हणून महाराष्ट्र आघाडीवर आहे. असे असले तरी एक खंत आहे की, केंद्र सरकारकडून मान्यता असूनही अद्याप राज्य सरकारकडून आयबीबीएफकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करावेत. इतर राज्य आपापल्या खेळाडूंची दखल घेत असताना महाराष्ट्रातील उदासीनताही दूर व्हावी, हीच अपेक्षा आहे.

Web Title: Tricolor 23 years after the Asian Bodybuilding Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.