‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’चीही भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:41 AM2017-08-31T01:41:38+5:302017-08-31T01:41:49+5:30

मुंबईत मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने मुंबई व आसपासच्या शहरांची जी अवस्था झाली आणि लाखो लोकांचे जे हाल झाले, त्याला महापालिका, राज्य सरकार व सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी यांची बेपर्वाई, अनास्था आणि गलथान कारभार कारणीभूत आ

Sultani also stressed in the 'Assamese' crisis | ‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’चीही भर

‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’चीही भर

googlenewsNext

मुंबईत मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने मुंबई व आसपासच्या शहरांची जी अवस्था झाली आणि लाखो लोकांचे जे हाल झाले, त्याला महापालिका, राज्य सरकार व सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी यांची बेपर्वाई, अनास्था आणि गलथान कारभार कारणीभूत आहे. कालचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती होता, हे खरेच. पण राज्यकर्त्यांच्या बेदरकारीमुळे मुंबईकरांना अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागला. मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर या सर्व शहरांतही काल अतिशय बिकट अवस्थाच होती. रेल्वे बंद, रस्त्यांवर पाणीच पाणी, त्यामुळे वाहतूक ठप्प, झोपड्याच नव्हे, तर इमारतींमध्ये पाण्याबरोबर चिखलाचे साम्राज्य, कार्यालयांतून घरी पोहोचणे शक्य नाही, लाखो पुरुष-स्त्रिया कमरेइतक्या पाण्यातून घराकडे चालत आहेत, कोणी खड्ड्यात पडले, कोणी बुडताबुडता वाचले, अशी भयावह अवस्था होती. रेल्वेमध्ये लोक दहा-दहा तास अडकले होते, घरी कधी पोहोचण्याची शाश्वती नव्हती, संपूर्ण शहरच पाण्याखाली गेले होते. हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. पण त्याकडे महापालिका व सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. सरकारी यंत्रणेने अंदाज घेऊ न माध्यमांद्वारे त्याची माहिती दिली असती, तर मुंबईकर मंगळवारी सकाळी बाहेर पडलेच नसते. पण यंत्रणा त्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या. सुस्तावलेली व ढिम्म सरकारी यंत्रणा जागी झाली लोकांचे हाल सुरू झाल्यानंतर. तेव्हा खूपच उशीर झाला होता. दुपारनंतर शाळा, महाविद्यालये सोडण्यात आली, कार्यालयीन कर्मचाºयांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हाच नेमका पावसाचा जोर वाढला होता आणि ती भरतीची वेळ असल्याने पाण्याचा निचरा होणेही अशक्य होते. लोकांना आणि विद्यार्थ्यांना अशा वेळी बाहेर पडण्यास सांगणे चुकीचे होते. लोकांची काळजी असती, तर धोक्यात टाकणाºया सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याच नसत्या. रस्त्यांवर वाहने नाहीत, रेल्वे बंद आहे आणि कमरेइतक्या पाण्यातून चालणे शक्य नाही, हे दिसत असताना घरी जायला सांगून जनतेच्या हालात भर घालण्याचे कामच यंत्रणेने केले. त्याऐवजी आहे, तिथेच रात्रभर थांबा, तिथे आम्ही जेवणाची सोय करू, असे सरकारने सांगायला हवे होते. महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने आम्ही हे केले, ते केले, तमूक करून दाखवले, अशा अनेक वल्गना केल्या होत्या. पण त्या तद्दन खोट्या असल्याचे या पावसाने दाखवून दिले. आम्ही पम्पिंग स्टेशन सुरू ठेवली होती, पण भरतीमुळे पाण्याचा निचरा झाला नाही, अशी सारवासारव महापालिका, महापौर व शिवसेना नेते करीत आहेत. पण मुंबईतील अनधिकृत बांधकामे रोखली असती, नालेसफाई नीट केली असती, रस्त्यांची कामे व्यवस्थित झाली असती, बेकायदा कामे करणाºयांना अभय दिले नसते, तर या नैसर्गिक आपत्तीत इतके हाल झाले नसते. जे शिवसेनेचे, तेच राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे. राज्य सरकारने दुपारपर्यंत अतिवृष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मग घाईघाईने मुख्यमंत्री आपत्ती नियंत्रण कक्षात गेले, त्याची पाहणी केली व सूचना देऊ लागले. आठ तासांत मुंबईच्या उपनगरांत ३२५ मिलीमीटर पाऊस झाला. याआधी २६ जुलै २00५ साली ९00 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजे कालचा पाऊस खूप कमी होता. पण दुरावस्था २६ जुलैपेक्षाही अधिक होती. मृतांची संख्या काल कमी होती, इतकेच काय ते समाधान. पण स्थिती भयावह होती आणि त्याचे कारण आहे, यंत्रणांचे दुर्लक्ष. केवळ मतपेटीचे राजकारण करण्यासाठी मोठी व छोटी अनधिकृत बांधकामे नियमित करणे, विविध प्रकल्पांच्या नावाखाली सतत रस्ते खणणे, सखल भागांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी योजना न आखणे याला आणखी काय म्हणायचे? लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे टक्केवारीचे अर्थकारणही याला कारणीभूत आहे. आता अमिताभ बच्चनपासून सारेच जण मुंबईकरांच्या धैर्याला सलाम करू लागले आहेत. अशा सलाम करणाºयांचे आभार जरूर माना, पण आपली जबाबदारी पार न पाडणाºयांचे काय करायचे? त्यांना काहीच शिक्षा नाही? आणखी दोन वर्षांनी १00 मिलीमीटर पाऊ स पडला, तर याहून अधिक हाल होतील, यात शंका नाही. याचे कारण भ्रष्ट, बेदरकार आणि कोडगी यंत्रणा. आता आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते शिवसेना व भाजपावर हल्ले चढवतील. पण या शहराच्या आजच्या अवस्थेलाही ते तितकेच जबाबदार आहेत. मुंबईला ओरबडून खाण्यात सारेच राजकीय पक्ष पुढे असतात. लोकांचे काल पावसामुळे हाल होत असताना, कोणत्याही पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी रस्त्यांवर उतरल्याचे दिसले नाही. लोकच एकमेकांना मदत करीत होते. स्वयंसेवी संस्थांनीही त्यात पुढाकार घेतला. या स्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्वांनीच मुंबईकरांची माफी मागायला हवी. पण मुंबईच्या महापौरांनी ‘आम्ही उत्तम काम केले. मी माफी मागणार नाही’, असेच जाहीर केले. असे नेतृत्व मुंबई व जवळच्या शहरांना लाभले आहे. निवडणुकांमध्ये या नेतृत्वाला खडसावून विचारायला हवे. प्रसंगी धडेही शिकवायला हवेत. अन्यथा भविष्यात अशा सुल्तानी संकटांची वारंवार तयारी ठेवायला लागेल.

Web Title: Sultani also stressed in the 'Assamese' crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.