पाटलांचा ‘उदय’ अन् ‘देशमुखां’ची ‘एन्ट्री’

By सचिन जवळकोटे | Published: February 19, 2023 01:07 PM2023-02-19T13:07:00+5:302023-02-19T13:07:10+5:30

लगाव बत्ती; पडद्यामागच्या गुप्त हालचालींचा विस्मयजनक शोध

Patal's Uday and Deshmukh's Entry | पाटलांचा ‘उदय’ अन् ‘देशमुखां’ची ‘एन्ट्री’

पाटलांचा ‘उदय’ अन् ‘देशमुखां’ची ‘एन्ट्री’

Next

सचिन जवळकोटे

‘कमळ’ पार्टीचा एक बडा नेता सोलापुरात येतो. बाकीच्या नेत्यांना काहीही कळू न देता थेट ‘पाटलां’च्या बंगल्यावर जातो. तोंडभरून एकमेकांचं कौतुक तिथं केलं जातं; तेव्हाच हुश्शाऽऽर सोलापूरकरांनी ओळखलेलं की, इथल्या राजकारणात नव्या समीकरणांचा ‘उदय’ होणार.. तेव्हा पडद्यामागच्या घडामोडींना ‘बत्ती’ लावणं क्रमप्राप्त होतं. कारण, पंधरा दिवसांपूर्वीच ‘उत्तर’चे ‘देशमुख’ही गुपचूपपणे ‘पाटलां’च्या बंगल्यात जाऊन आलेले असतात, हे कुणालाच ठाऊक नसतं. लगाव बत्ती..

रेल्वे लाइन्स भागातलं ‘पाटील’ घराणंसुद्धा ‘कमर्शियल पॉलिटिक्स’मध्ये ‘माहीर’ असलं तरी एकेकाळी ‘गँगस्टर्स’च्या विश्वात ‘शातीर’ ठरलेलं. आपल्या पूर्वजांचा तो इतिहास पुसून नवा अध्याय घडविण्यासाठी ‘उदय’अण्णांची नेहमीच धडपड. अठरा वर्षांपूर्वी मिसरूड फुटायच्या कोवळ्या वयात त्यांनी थेट ‘सीएम’पदाला चॅलेंज केलेलं. ‘दक्षिण’ तालुक्यात ‘सुशीलकुमारां’च्या विरोधात जेव्हा ते पहिल्यांदा उभे राहिले होते, तेव्हा ते म्हणे ‘अज्ञानी’ होते. कायद्याच्या भाषेत ‘सज्ञान’ नव्हते. मात्र त्यावेळी ‘शिंदें’च्या पराभवासाठी महाराष्ट्रातील कैक बड्या नेत्यांनी ‘खोक्यांच्या राशी’ पाटलांच्या गोणीत ओतल्या होत्या; परंतु ही ‘बंडलं’ या ‘उदय’अण्णांपर्यंत पोहोचलीत नाहीत. नंतर हे गुपित उघड झाल्यावर घराण्यात ‘भाऊबंदकी’ पेटली. इस्टेटीवरून घरातच कैक ‘गँग’ निर्माण झाल्या.

याच काळात ‘सुशीलकुमारां’नी त्यांना ‘हात’ दिला. त्यासाठी ‘फताटें’ची ‘वकिली’ कामी आली. ‘दक्षिण’च्या निवडणुकीत ज्या ‘पाटलां’नी सर्वाधिक त्रास दिला, त्यांनाच घरी बोलावून पाहुणचारही केला. प्रचारावेळी रात्री ‘मिसेस सी.एम.’ची गाडी अडवून त्यात ‘बंडलांची बॅग’ असल्याचा कांगावा ‘उज्ज्वलाताईं’च्या खूप जिव्हारी लागलेला. मात्र, तरीही ‘उदयअण्णां’ना घरी बोलावणं, ही ‘शिंदे घराण्याची दिलदारी’ होती अन् ‘सुशीलकुमारां’च्या नेतृत्वाची मुत्सद्देगिरीही. मात्र ‘प्रणितीताईं’च्या राजकीय एन्ट्रीनंतर हे ‘अण्णा’ही इतरांप्रमाणेच ‘जनवात्सल्य’पासून दूर झाले.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून ‘उदयअण्णा’ जणू राजकीय विजनवासात असल्यासारखेच. गेल्या दोन आमदारकीला ‘उत्तर’मध्ये त्यांच्या नावाची चर्चा ऐकू यायची. मात्र ‘अण्णां’च्या ‘रोरो’ रेल्वेप्रमाणेच गुडूप व्हायची. दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते ‘कमळ’वाल्यांच्या जास्तच संपर्कात आलेले. मात्र अक्कलकोटच्या ‘म्हेत्रे’ अण्णांसारखंच यांनाही फिरविलं गेलेलं. काही दिवसांपूर्वी ‘भिडे गुरुजी’ त्यांच्या बंगल्यावर येऊन गेल्यानंतर अनेकांचे डोळे किलबिले झाले. परवा ‘श्रीकांत’ येऊन गेल्यानंतर तर हेच डोळे पुरते विस्फारले गेले.

‘उदयअण्णां’चा पार्टीप्रवेश शंभर टक्के फिक्स. कदाचित याच आठवड्यात मुंबईत त्याचा इव्हेंटही होईल. ‘अण्णां’च्या एन्ट्रीमुळे कोणत्या ‘देशमुखां’ना धक्का बसणार, याच्याही ‘उत्तर’ अन् दक्षिणमध्ये पैजा लागलेल्या. मात्र ‘कमळ’ पार्टीत ‘पाटलांचा उदय’ इतर नेत्यांना विश्वासात घेऊनच होतोय, हे खूप कमी कार्यकर्त्यांना ठाऊक. पंधरा दिवसांपूर्वी ‘विजयकुमारां’ची गाडी थेट याच ‘पाटलां’च्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. स्वागताला खुद्द ‘उदयअण्णा’. खरं तर ‘देशमुख’ अन् ‘पाटील’ यांची भेट अत्यंत गुप्त ठेवलेली; मात्र ‘देशमुखां’च्या एन्ट्रीवेळी एका कॉमन पब्लिकनं हा फोटो टिपलेला. ‘लगाव बत्ती’साठी कामाला येईल या विश्वासावर कौतुकानं पाठवून दिलेला असेल. आतमध्ये चहा-पाणी झाल्यानंतर दोघांमध्ये राजकारण सोडून बाकीचीच चर्चा झाली. मात्र ‘आमची पार्टी किती कडक शिस्तीची’ हेच ‘देशमुख’ वारंवार सांगू लागलेले. खरं तर ही ‘अण्णां’साठी सावधगिरीची सूचना होती की उगाचंच भीती घालण्याची खेळी होती, हे ‘देशमुखां’नाच ठाऊक.

इतरांचा कॉल लवकर न उचलणारे ‘देशमुख’ स्वत:हून ‘पाटलां’च्या बंगल्यावर कसे काय गेले, याचं उत्तरही धक्कादायक, विस्मयजनक. जिल्ह्यातील अकराच्या अकरा आमदार ‘कमळ’वाल्यांची मोहीम ‘फडणवीसां’च्या केबिनमधूनच सुरू झालेली. त्यांच्याच सूचनेवरून ‘भारतीय’ टीमनं ‘इनकमिंग’ स्कीम राबवायला सुरुवात केलेली. ‘उदयअण्णां’साठी ‘संघाची शाखा’ ही मुंबईत फिल्डिंग लावून बसलेली. त्यामुळं इच्छा असो वा नसो, ‘देशमुखां’ना ही बदलती समीकरणं स्वीकारणं, अपरिहार्य ठरलेले. तशात आगामी विस्तारात ‘विजयकुमारां’चंही नाव जवळपास निश्चित झालेलं. त्यांच्यासाठी ‘विक्रमदादां’नी वरपर्यंत शब्द टाकलेला. महापालिका जिंकण्याचं गणित मांडून दाखवलेलं. आता विषय फक्त खात्याचा. पार्टी ‘जलसंधारण’ द्यायला तयार पण यांना म्हणे ‘परिवहन’च पाहिजे. कुठल्या भंगार गाड्यांमध्ये जीव अटकलाय कुणास ठाऊक. तर सांगायचा मुद्दा ‘लाल बत्तीची गाडी’ मिळत असेल हे ‘देशमुख’ अन् कैक ‘पाटील’ जवळ करण्याच्या तयारीत. इच्छा असो वा नसो. राहता राहिला विषय, हे ‘उदय’अण्णा भविष्यात कोणत्या टापूत ‘आमदारकी’ची ‘पाटील’की गाजवत बसणार. लगाव बत्ती..

 

आमदारकीचा ‘उदय’ कोणत्या पट्ट्यात?

  • १) ‘कमळ’वाल्यांनी महाराष्ट्रातही ‘योगीं’चा ‘यूपी पॅटर्न’ लागू केल्यास आगामी आमदारकीला दिसू शकतात नवे चेहरे. ‘शहर उत्तर’मध्ये ‘विजयकुमारां’ऐवजी त्यांच्या ‘डॉक्टर सुपुत्रा’लाही मिळू शकते संधी. मात्र ‘घराणेशाही’च्या पाॅइंटवर होऊ शकतो ‘उदय’अण्णांचा विचार. या टापूत ‘तमतम मंदी’ बक्कळ असली तरीही सोडावी लागतात भरभरून खोकी. करावा लागतो हात ढिला.. त्यासाठी ‘अण्णां’ना बदलावी लागेल जुनी सवय. समझनेवालों को इशारा काफी!
  • २) ‘उदयअण्णां’चा बंगला ‘मध्य’मध्ये. त्यांचं सामाजिक कामही याच एरियात. ‘प्रणितीताईं’चेच विरोधात एकच हुकमी पर्याय देण्याची खेळीही ‘कमळ’वाल्यांच्या डोक्यात. त्यात ‘ताई’ जर ‘खासदारकी’ला उभारल्या तर मग ‘पाटलांना रान मोकळंच’; कारण ‘हात’वाल्यांकडं दुसरा ‘खमक्या’ चेहराच नाही. मात्र ‘मध्य’मध्ये ‘पाटलां’च्या विरोधात अख्खी ‘बेस’ होऊ शकते एक, हेही तितकंच सत्य. जुना इतिहास लोकं विसरत नसतात कधीकधी.
  • ३) ‘यूपी पॅटर्न’चा फटका बसू शकतो ‘दक्षिण’मध्येही ‘देशमुखां’ना. घराणेशाहीच्याच मुद्द्यावर ‘मनीष भैय्यां’ऐवजी दुसरा चेहरा देण्याची वेळ आली तर इथं होऊ शकतो ‘उदयअण्णां’चा विचार. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून त्यांचेच चुलतबंधू ‘अमर’ इथं जोरदार तयारीत. त्यामुळं वेळप्रसंगी ‘पाटील व्हर्सेस पाटील’चा संघर्ष नाकारणता नाही येत. असं झालं तर सारेच नेते ‘एन्जॉय’ करायला एका पयावर तयार. जुने हिशेब पूर्ण करण्यासाठी. लगाव बत्ती..

आता आमदारकीची पाटील की नेमकी कोणत्या टापूत ?

‘विजयकुमार’ भलेही आयुष्यभर ‘कमळ’ पार्टीत असले तरीही त्यांनी ‘थोरले काका बारामतीकर’ यांची ‘पॉलिसी’ उचललेली. आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या अनेक मोठ्या घराण्यात ‘भाऊबंदकीची बीजं’ रोवण्याचं राजकारण नेहमीच यशस्वी ठरलेले. वाटल्यास थोबडे, उंबरजे, बनशेट्टी, रमणशेट्टी, गड्डम अन् शेळगींच्या बिराजदारांना विचारा. ‘परळीचे मुंडे’ याही घराण्यात तयार करण्याचे काम इमानेइतबारे केलं गेलेलं. आता हे सारं कमी पडलं की काय म्हणून मसरे गल्लीतल्या ‘प्रकाशअण्णां’ची भेटही भुवया उंचावणारी ठरलेली.

राजस्थानला एका लग्नाला गेलेली ‘देशमुख टीम’ रेल्वेत ‘वालें’सोबतही रमली. अजमेरच्या दर्ग्यात या ‘देशमुख-वालें’नी हब्बू-मसरे या मानकऱ्यांसोबत दिलेली. त्यासाठी एकेक हजाराचं कॉन्ट्रिब्युशनही केलेलं.

विशेष म्हणजे येताना रेल्वेत स्वत:ची बोगी सोडून याच ‘वालें’सोबत प्रवास केलेला. ‘प्रकाशअण्णां’साठी खास केक मागवून तोही कौतुकानं कापलेला. मोबाईलमधले ‘मोदीं’चे व्हिडीओही दाखविलेले. ‘वालें’चं प्रेम ‘हात’ पार्टीवर, निष्ठा ‘शिवदारें’च्या बँकेवर मात्र आता वेळ पडली आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचं ‘कमळ’ चिन्ह घेऊन कसब्यात उभारलं तर आश्चर्य वाटायला नको. नंतर ‘हिंग हँग’ म्हणायला नको.. लगाव बत्ती..

Web Title: Patal's Uday and Deshmukh's Entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.