माझ्या देशावर माझे प्रेम आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 11:53 PM2019-03-02T23:53:07+5:302019-03-02T23:53:21+5:30

पुलवामानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

My love is for my country! | माझ्या देशावर माझे प्रेम आहे!

माझ्या देशावर माझे प्रेम आहे!

googlenewsNext

- धर्मराज हल्लाळे
पुलवामानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. जवानांच्या शौर्याचा भारतीयांनी जल्लोष केला. तिरंगा फडकला, दुसऱ्या दिवशीही विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या धाडसी कारवाईने पाकिस्तानचे विमान कोसळले. परंतु अभिनंदन पाकिस्तानी हद्दीत शत्रूंच्या तावडीत सापडले. त्यावेळी प्रत्येक भारतीयाला अभिनंदनच्या सुटकेची प्रतीक्षा होती. दबावापुढे पाकिस्तान नरमले. अभिनंदन वाघा सीमेवरून मायभूमीत परतले. तो क्षणही भारतभर देशप्रेमाचा उत्सवाचा होता. अभिनंदन यांनी दाखविलेले धाडस आणि शत्रूच्या तावडीत राहून राखलेला स्वाभिमान स्फुरण आणणारा होता. ज्या- ज्या वेळी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. सैन्य कारवाई झाली, त्या- त्यावेळी भारतभर देशप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन घडते. अलिकडच्या काळात कारगिल घडले होते. त्याही वेळी आपण शत्रूला पाणी पाजले. ज्यावेळी कारगील घडत होते आणि एखादा जवान, अधिकारी शहीद होत होता, त्यावेळी हजारो तरुण आम्ही सैन्यात भरती होऊ असे ठणकावून सांगत होते. एक प्रसंग आठवतो कारगिल लढाईत लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील जवान आणि उदगीर येथील अधिकारी शहीद झाले. त्या दोन्ही शहिदांच्या अंत्ययात्रेला हजारो तरुण जमले होते. तिरंगा ध्वज हाती घेऊन सर्वजण पानगावच्या दिशेने धावत होते. भारत मातेचा जयघोष, शहीद जवानांचा गौरव आणि देशभक्तीने उसळलेला जनसागर सर्वत्र पाहायला मिळत होता. हीच स्थिती पुलवामानंतरही देशाच्या कानाकोपऱ्यात आपण पाहिली.
शहीद झालेले कोलकाता येथील सीआरपीएफचे जवान बबलू संतारा, सीमाभागात दुर्घटनेत शहीद झालेले वायूदलातील अधिकारी निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नी जे काही बोलल्या ते अंतर्मुख करणारे आहे. बबलू संतारा यांच्या पत्नीने युद्ध नको शांतताच हवी, हे ठणकावून सांगितले. त्यापुढे जाऊन निनाद यांच्या वीरपत्नीने सोशल मिडियावर युध्द- युध्द करणाऱ्यांना सांगितलेले शब्द मोलाचे आहेत. दहशवादाविरुध्द युध्द करावेच लागेल. परंतु, प्रत्येकाने आपल्या परिवारातील एकाला सैन्यात पाठविण्याची तयारी ठेवली पाहिजे. ते कोणत्याही कारणामुळे शक्य नसेल तर स्वत:ला देशसेवेत झोकून दिले पाहिजे. छोट्या- छोट्या कामांमधूनही आपण देशप्रेम व्यक्त करु शकतो. नक्कीच, देशप्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वांनीच सीमेवर जाऊन लढले पाहिजे, असे नाही. आपल्या अवती-भवतीचे प्रश्न घेऊन आपण आपल्या देशावर प्रेम करु शकतो.
युध्द काळात राष्ट्रभावना अधिक सजग असते. प्रत्येकाला आपले देशप्रेम व्यक्त करायचे असते आणि ते स्वाभाविकही आहे. परंतु, केवळ युध्दाची भाषा करुन देशप्रेम व्यक्त होते असे नाही. आपले सैन्य समर्थ आहे. त्यांच्या कारवाईला आपण पाठिंबा दिला पाहिजे. मात्र, त्याचबरोबर शांततेच्या काळातही आमचे आमच्या देशावरील प्रेम व्यक्त करताना आम्ही तसूभरही मागे नसले पाहिजे. थोर समाजसेवक, विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी प्रतिज्ञा नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक वाक्याचे निरुपण करणारे ते पुस्तक आहे. जेव्हा आपण माझे माझ्या देशावर प्रेम आहे असे म्हणतो तेव्हा मी नेमके काय केले पाहिजे, याचा विचार अंतर्मनात आला पाहिजे. नानाविध जात, धर्म, पंथाची माणसे या देशात गुण्या- गोविंदाने नांदतात. आम्ही इथले सौहार्द टिकले पाहिजे, यासाठी सदोदित सतर्क असले पाहिजे. सामाजिक सलोखा कायम राखला पाहिजे. दशतवाद्यांना समर्थन देणारे राष्ट्र जितके घातक, तितकेच आपल्याच अवती- भोवती राहून दहशवादी विचार आणि कृत्यांना समर्थन देणारेही घातक आहेत. विवेकी विचार संपविण्यासाठी माणसे मारणारा विचार गाडला पाहिजे. अर्थात आमची देशभक्ती ही प्रासंगिक ठरू नये. हा मोलाचा विचार निनादच्या वीरपत्नीने दिला आहे.
दहशवादाचा बिमोड केला पाहिजे. एकदाची कटकट मिटविली पाहिजे. युध्दातून प्रश्न मार्गी लावला पाहिजे, हा विचार येणे स्वाभाविक आहे. परंतु, लष्करी कारवाई केल्यानंतरही आतंकवाद्यांचा गोळीबार सुरुच राहिला आहे. एकीकडे अभिनंदन सुखरुप आले, त्याचवेळी दहशतवाद्यांच्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. स्वातंत्र्यापासून आजतागायत आपण युध्दही केले आणि शांततेची चर्चाही केली. एकीकडे शांततेची वार्ता सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ले केले, ही वस्तुस्थिती आहे. तरीही केवळ युध्द हा अंतिम पर्याय नाही, हे सांगणारा मोठा वर्ग आहे. सैन्यातील निवृत्त वरिष्ठ अधिका-यांनी दहशतवादाविरुध्दच्या कारवाईचे समर्थन करताना चर्चेचा मार्गही सांगितला. नक्कीच आज तातडीने ती वेळ नाही. पाकिस्तानला ठोस भूमिका घ्यावी लागेल. दहशतवादी कारवायांना जन्म देणारी ठिकाणे नेस्तनाबूत करावी लागतील. शेवटी आपले सैन्य ताकदीने लढेल आणि कायम जिंकेलही. त्यासाठी जयजयकार करताना माझे माझ्या देशावर प्रेम आहे आणि त्यासाठी मी युध्दजन्य स्थितीतच नव्हे तर कायम कटिबध्द आहे, ही ग्वाही छोट्या- छोट्या कृतीतून द्यावी लागणार आहे.

Web Title: My love is for my country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.