मोदीजी बनले संपूर्ण देशाचे आशास्थान!

By विजय दर्डा | Published: May 27, 2019 05:47 AM2019-05-27T05:47:53+5:302019-05-27T05:48:45+5:30

लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम मनापासून अभिनंदन.

Modiji became the hope of the whole country! | मोदीजी बनले संपूर्ण देशाचे आशास्थान!

मोदीजी बनले संपूर्ण देशाचे आशास्थान!

googlenewsNext

- विजय दर्डा

लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेही अभिनंदन करीन, कारण त्यांनी काँग्रेसची विचारसरणी खंबीरपणे देशापुढे मांडली. तरीही काँग्रेसला यश का मिळाले नाही, याची चर्चा नंतर केव्हा तरी करू. सध्या तरी मी फक्त मोदीजींविषयीच बोलणार आहे. या जनादेशाचा स्पष्ट संदेश आहे की, मोदी हे संपूर्ण देशाच्या आशा-आकांक्षांची प्रबळ प्रतिमा बनले आहेत. देशवासी त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहात आहेत. देशाची ही अपेक्षा मोदी पूर्ण करतील, अशी अपेक्षा करू या. या ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी देशाला दिलेला पहिला संदेश मोठा सकारात्मक आहे. मोदींची ही विनम्रता भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत झिरपली तर खरोखरच या देशात सामाजिक समरसता, समन्वय व विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल.
हे नक्की की या निकालाने भले भले राजकीय पंडितही चक्रावून गेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अपवाद वगळला तर अशा निकालाची अपेक्षा कोणीच केली नसेल! निवडणुकीच्या काळात गप्पांमध्ये फडणवीस यांनी मला निकालांविषयी जे काही सांगितले होते ते पूर्णत: खरे ठरले. फडणवीस यांची रणनीती, कठोर परिश्रम व सर्वसामान्य माणसाबद्दलचे त्यांचे समर्पण यामुळे महाराष्ट्रात भाजपचा झेंडा दिमाखाने फडकला. जाती-पातींच्या गणितांवर चालणाऱ्या भारतीय राजकारणाचे स्वरूप लक्षात घेता या वेळी बहुधा कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज निवडणुकीच्या आधी वर्तविला गेला होता. भाजप, काँग्रेस किंवा महागठबंधन यापैकी कोणालाही एवढे प्रचंड बहुमत मिळू शकेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती; परंतु नरेंद्र मोदींच्या लाटेने हे सर्व आडाखे खोटे ठरविले. एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या एवढेच नव्हे तर प. बंगालमध्येही शानदार यश मिळविले. काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आली तेथेही भाजपने पुन्हा आश्चर्यकारक घट्ट पाय रोवला! काही महिन्यांपूर्वीच्या पराभवाला विजयात बदलणे सोपे नव्हते. खरं तर मोदींच्या सत्तेच्या पहिल्या पर्वात अनेक नकारात्मक मुद्देही उपस्थित झाले होते. वाढती बेरोजगारी, ‘जीडीपी’ची कुंठलेली गती, महागाईतील वाढ असे अनेक मुद्दे होते. असे असूनही मतदारांनी काँग्रेसला नाकारले. मोदीजींच्या झोळीत भरभरून मते टाकली! ३५ वर्षांहून कमी वयाच्या तरुण पिढीने मोदीजींवर विश्वास टाकला. असे का झाले याचा विरोधकांना गंभीरपणे विचार करावा लागेल.
निवडणुकीच्या अभ्यासकांना असे वाटते की या वेळची निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी या एकाच व्यक्तीसाठी घेतलेले जणू सार्वमत होते. संपूर्ण पक्ष ठामपणे पाठीशी असूनही कुठेही मोदींहून पक्ष ठळकपणे पुढे दिसला नाही. स्पष्टपणे मोदींच्या नावे मते मागितली गेली व विजयी उमेदवारांनी त्या यशाचा तुराही मोदींच्याच शिरात खोवला. ‘मोदी है तो मुमकीन है’ हे मोदींनी लोकशाहीच्या या महोत्सवात शब्दश: खरे करू दाखविले!


देशापुढील समस्यांबाबतही ‘मोदी है तो मुमकीन है’ हे खरे करून दाखविण्याची मोठी जबाबदारी मोदीजींवर आहे. विजयानंतरच्या पहिल्या भाषणात मोदींनी फार छान वक्तव्य केले; ‘यापुढे देशात दोनच जाती असतील. एक गरीब आणि दुसरी गरिबीतून बाहेर पडण्याची उमेद बाळगणाऱ्यांची. या दोन जाती मिळून देशावरील गरिबीचा कलंक पुसून टाकतील.’ मला हा संकल्प महत्त्वाचा वाटतो. भारताच्या विकासात गरिबी हाच मोठा अडसर आहे; पण गरिबीकडे व्यापक संदर्भाने पाहण्याची गरज आहे, असे मला वाटते. आर्थिक गरिबी ही मोठी समस्या आहेच; पण त्याचबरोबर वैचारिक गरिबी, शैक्षणिक गरिबी, रोजगाराची गरिबी आणि आरोग्यसेवांची गरिबी यांचे उच्चाटनही तेवढेच महत्त्वाचे आहे.
शनिवारी सायंकाळी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ‘एनडीए’च्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांच्या व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मोदीजींनी जो संदेश दिला तो त्यांची नवी प्रतिमा समोर आणणारा आहे. मोदीजी असे म्हणाले की, अल्पसंख्य समाजावर सातत्याने अन्याय केला गेला आहे. त्यांचा विकास झाला नाही. आता आपण या समाजाचाही विश्वास जिंकण्याची गरज आहे. हा सकारात्मक संदेश मोदीजींनी प्रत्यक्षात खरा करून दाखविला तर देशात शांततेचे एक नवे पर्व सुरू होईल.

नक्कीच मोदीजींपुढे लोकांच्या आशा-आकांक्षांचा मोठा डोंगर उभा आहे. मोठ्या विजयाने आशाही वाढल्या आहेत; पण मोदी आव्हाने स्वीकारतात. धाडसी निर्णय घेतात. त्यांच्यासोबत चाणक्यच्या भूमिकेत अमित शहा यांच्यासारखी अशी व्यक्ती आहे जी काहीच अशक्य मानत नाही. भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात अमित शहा यांची जबरदस्त क्षमता सिद्ध झाली आहे. थोडक्यात सांगायचे, तर या देशाच्या मनात फार मोठी आसक्ती आहे. ती आहे प्रत्येकाला पोटभर अन्नाची, डोक्यावर छताची, प्रत्येक हाताला काम मिळण्याची, प्रत्येकाला उत्तम आरोग्यसेवेची, समाजात सुख-शांती नांदण्याची व शेजारी देशांशी चांगले संबंध असण्याची! जगात आपली ओळख विकसनशील नव्हे, तर विकसित देश म्हणून निर्माण करण्याची देशवासीयांना ओढ लागली आहे. मोदींनी हे शक्य केले तर आम्हीही म्हणूू, ‘मोदी है इसलिए मुमकीन हुआ!’
(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह.)

Web Title: Modiji became the hope of the whole country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.