चित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:40 AM2018-02-01T00:40:52+5:302018-02-01T00:41:01+5:30

कोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते.

 Mind | चित्त

चित्त

Next

- डॉ. रामचंद्र देखणे

कोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते. कोणत्याही कामात एकरूप झालेल्या सामान्य माणसालाही ही कर्माशी जोडलेली चित्ताची एकाग्रता अनुभवायला येते.
भक्ती म्हणजे परमात्म्याशी होणारी एकाग्रता होय. तुकाराममहाराज देवाजवळ मागणी करतात,
‘‘तुज पाहता सामोरी
दृष्टी न फिरे माघारी
माझे चित्त तुझे पाया
मिठी पडली पंढरीराया’’
देवा माझे चित्त आणि तुझे पाय याची एकरूपता होऊ दे या एकरूपतेने माझे चित्त आणि दृष्टी पुन्हा माघारी फिरणार नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजेच ध्यान होय. चित्ताच्या एकंदर पाच भूमिका किंवा पायºया आहेत. १) मूढ, २) क्षिप्त, ३) विक्षिप्त, ४) एकाग्र ५) निरुद्ध अशा त्या पाच पायºया आहेत.
मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त अवस्थेत चित्त हे बºयाच वेळा अस्थिर तर कधीतरी स्थिर होते पण एकाग्र आणि निरुद्ध अवस्थेत मात्र ते स्थिर आणि आत्यंतिक एकरूपाला पावलेले असते. चित्त हे सत्व आणि तम या दोन गुणात स्थिर होते परंतु तमोगुणात ते परतंत्र होऊन स्थिर होते.
तर सत्वगुणात ज्ञानामुळे स्थिर होते. तमोगुणात चित्त स्थिरावणे ही ‘मूढ’ अवस्था आहे. क्षिप्त म्हणजे खेपा घालणे, येरझारा करणे, विषय भोगात ते चित्त ‘क्षिप्त’ असते. काही वेळा ते स्थिर तर काही वेळा ते चंचल असते. ही चित्ताची अवस्था ‘विक्षिप्त’ होय. पण जेव्हा सत्वगुणाची वाढ होऊन ते ध्यानमग्न होते तेव्हा ते ‘एकाग्र’ या अवस्थेला तर एकाग्रतेतून जेव्हा ते कुठेही बाजूला जात नाही तेव्हा ‘निरुद्ध’ या अवस्थेला गेलेले असते. मग योग्याची अवस्था प्राप्त होते. भगवान पतंजलीने योगाची व्याख्या करताना म्हटले आहे की,
‘‘योगश्चित्तवृत्तिनिरोध :’’ म्हणजे जीवन व्यवहारातील साध्या साध्या आणि सामान्य क्रियेपासून तो थेट योगावस्थेपर्यंत चित्ताचा प्रवास होत असतो. आणि एकेका टप्प्यातून चित्ताची प्रग्लभता वाढत जाऊन माणूस भोगी अवस्था सांडून भोगी ते योगी या अवस्थेपर्यंत जातो.

Web Title:  Mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.