तोडगा काढण्यासाठी चर्चा हाच अंतिम मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:05 AM2018-08-04T03:05:44+5:302018-08-04T03:06:01+5:30

या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटना. मराठा आरक्षणावर रान पेटल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं महामंथन घडवून आणलं. दुसरी चटका लावणारी.

 The last route discussed is to solve the solution | तोडगा काढण्यासाठी चर्चा हाच अंतिम मार्ग

तोडगा काढण्यासाठी चर्चा हाच अंतिम मार्ग

Next

- डॉ. उदय निरगुडकर
(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)

या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटना. मराठा आरक्षणावर रान पेटल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं महामंथन घडवून आणलं. दुसरी चटका लावणारी. ती म्हणजे आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून ३० जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू.

मराठा आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहून अखेर मुख्यमंत्र्यांनी सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. आ.ह. साळुंखे, राम ताकवले, अमोल कोल्हे, हणमंत गायकवाड, सदानंद मोरे, पोपटराव पवार, सयाजी शिंदे, नितीन चंद्रकांत देसाई यासारखे अनेक विचारवंत, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, कलाकारांना निमंत्रणं धाडली गेली. अर्थात काही आमंत्रितांनी या बैठकीला यायला नकार दिला. पण जे आले त्यांनी आपल्या सूचना सरकारपुढे स्पष्टपणे मांडल्या. आरक्षण द्यायचं कसं, त्यासाठीची न्यायालयीन लढाई कशी लढायची, यासारखे दीर्घकालीन मुद्दे आणि मराठा तरुणांना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, खासगी आणि सरकारी सेवेत ज्या संधी उपलब्ध आहेत त्या त्यांना कशा मिळवून देता येतील, केंद्र राज्याच्या योजनांचा लाभ त्यांना कसा देता येईल यासारख्या अल्पकालीन मुद्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. हिंसाचार, आत्महत्या न करण्याचं त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं. दुसरीकडे, ७ आॅगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिलाय. मराठवाड्यातलं परळी हे आता मराठा आंदोलनाचं केंद्र बनलंय. आंदोलन सुरूच राहणार आहे. पण, यापुढे ते शांततेच्या मार्गानं असणार आहे. हा निर्णय जसा स्वागतार्ह आहे. तसाच समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णयही स्वागतार्ह आहे. पण मुद्दा असा उरतो की चर्चा करून हा प्रश्न खरोखरच सुटणार आहे का? नोकरीच्या संधी उपलब्ध असल्या तरी त्या मराठा समाजाच्या तरुणांपर्यंत पोहोचवणार कशा? मान्यवरांनी केलेल्या सूचना मराठा समाजाला मान्य होणार आहेत का? मराठा समाजाचं प्रबोधन करण्यासाठी कोण पुढाकार घेणार? न्यायालयीन लढाई लढण्यासाठी नेमकं काय करणार? या चर्चेकडे मराठा समाजातल्या काही मान्यवरांनी पाठ का फिरवली? असो...
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आणि आंदोलनातला हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठा क्र ांती मोर्चाचं अभिनंदन. शेवटी कोणत्याही गोष्टीवर तोडगा काढण्याचा अंतिम मार्ग चर्चा हाच आहे. हिंसाचार करून न्यायालयीन लढाई जिंकता येत नाही. त्यासाठी पुरावे लागतात, संशोधन करावं लागतं, कायद्याचा किस पाडावा लागतो. हे सर्व करण्याची इच्छाशक्ती सरकारनं दाखवावी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी, सर्वपक्षीय राजकारण्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आर्थिकदृष्ट्या मागास पडत असल्याची भावना झालेल्या मराठा तरुणांचं पाऊल वाकडं पडू नये, यासाठी समाजातले हे धुरीण पुढाकार घेतील, ही आशा करायला हरकत नाही.

ट्रेकर्सची जिगरबाज कामगिरी
महाराष्ट्र हा दऱ्याखोºयांचा प्रदेश आहे. इथे अनेक अवघड घाट, वळणावळणाचे रस्ते आहेत. त्यातून फुललेलं निसर्गसौंदर्य पाहत रमतगमत चाललेल्या एकाच विद्यापीठातील ३१ जणांचा ग्रुप...एकाच बिल्डिंगमधील २१ माणसं आणि एकत्र काम करणारे ३० जण एका क्षणात होत्याचे नव्हते होतात. अलीकडच्या काळात माध्यमांनी रिपोर्ट केलेल्या अनेक अपघातांपैकी हा सर्वात भीषण, हृदयद्रावक, चटका लावणारा, अस्वस्थ आणि सुन्न करणारा असा अपघात. ज्या वास्तूत ही माणसं काम करत होती, ती वास्तू, कार्यालयातील जागा आज किती भकास, उदास असेल याची कल्पनादेखील करवत नाही. एका क्षणात सगळा अंधार पसरला. पण बातमी सांगायला आली ती एक प्रकाशाची तिरीप. या भीषण अपघातात आश्चर्यकारकरीत्या वाचलेला एकमेव पर्यटक प्रकाश सावंत-देसाई...ते मृत्यूच्या दाढेतून आणि खोल दरीतून कसेबसे वर येऊ शकले. त्यांच्यामुळेच ही बातमी जगाला कळू शकली. परंतु, त्यानंतर ज्या विद्युतवेगानं महाराष्ट्रातल्या ट्रेकर्सनी आणि प्रशासनानं पावलं उचलली, त्याचीही कुठंतरी माध्यमांनी नोंद घेतली पाहिजे. महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, ठाणे ट्रेकर्स... आज महाराष्ट्रातल्या कानाकोपºयात असे शेकडो ट्रेकर्स आहेत. ज्या ट्रेकर्सनी अशा अनेक अपघातांच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचं काम केलंय. कोसळणारा पाऊस, खोल कापत जाणारी दरी, भुसभुशीत माती...जिथं जायची छाती फक्त वाºयाच्या झोताला आणि कोसळणाºया धबधब्यालाच होईल. दिज आर अनसंग हीरोज. यांची नावं कधी तुम्हाला रस्त्यांवर, फ्लेक्सवर दिसणार नाहीत.. एक क्षण हात सटकला, दोरीवरची नजर ढिली झाली तर मृत्यू अटळ. इकडे काहीही करायला जायचं तर साक्षात यमाला मिठी मारण्यासारखं होतं. काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये अशीच गुहेत मुलं अडकली होती. त्याच्या बचावकार्याचं कौतुक जगभर झालं. तशाच प्रकारचं साहस, व्यवस्थापन, जिगर इथल्या ट्रेकर्सनी दाखवलं. सगळ्या आॅपरेशनचा थरार काय होता, अपुºया साधनानिशी कामगिरी करणाºया तमाम महाराष्ट्रातल्या ट्रेकर्सचं आव्हानं किती खडतर असतं हे लोकांसमोर यायला हवं. एकीकडे तोडणारे हात माध्यमं बातम्यांमधून तुम्हाला दाखवतात. तसंच हे जोडणारे हातदेखील दाखवतात. यापैकी कुणीही आम्हाला प्रसिद्धी द्या म्हणून आलेलं नाहीय. ८०० फूट खोल दरीत उतरून ट्रेकर्सनी जी जिगरबाज कामगिरी केली, त्याची नोंद घ्यायला हवी. एनडीआरएफचं पथक येण्यापूर्वीच अपघाताच्या ठिकाणी उतरण्यासाठी रोप-वे आणि इतर यंत्रणा ट्रेकर्सनी उभी केली होती. १४ मृतदेह बाहेर काढले होते.
ट्रेकिंग हा एक साहसी क्र ीडा प्रकार आहे, त्यात संघभावना आहे, विजिगिषु वृत्ती आहे, थरार आहे तसंच धोकासुद्धा आहे. कोसळणाºया पावसात, दºयाखोºयात आपला जीव धोक्यात घालून दुसºयाचा जीव वाचवणं किंवा छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह वरपर्यंत आणणं, ही गोष्ट सोपी नाही. तिथं धैर्याचा, संयमाचा कस लागतो. कसल्याही अपेक्षेशिवाय हे ट्रेकर्स संकटकाळात मदतीला धावून येतात. डोंगरदºयात विखुरलेले हे ट्रेकर्स मृत्यूच्या दाढेत अडकलेल्यांसाठी देवदूत असतात. अशा देवदूतांच्या योगदानाची दखल घेणं, त्यांच्या पाठीवर थाप देणं आपलं कर्तव्य आहे. ट्रेकर्ससोबतच प्रशासनाच्या कौशल्याची, त्यांच्या संवेदनशीलतेची कसोटी लावणारी ही घटना होती. या सर्वांच्या नि:स्पृह कार्याला सलाम.

Web Title:  The last route discussed is to solve the solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.