भारताचे जी २० अध्यक्षपद : शाश्वत स्वप्नांचा शोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:37 AM2023-11-30T11:37:02+5:302023-11-30T11:37:42+5:30

Narendra Modi: जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने विलक्षण कामगिरी केली याचा मला आनंद आहे. भारताने केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील.

India's G20 Presidency: In Search of Eternal Dreams! | भारताचे जी २० अध्यक्षपद : शाश्वत स्वप्नांचा शोध!

भारताचे जी २० अध्यक्षपद : शाश्वत स्वप्नांचा शोध!

नरेंद्र मोदी
(पंतप्रधान) 

भारताने जी २०चे अध्यक्षपद स्वीकारून आज ३६५ दिवस पूर्ण झाले आहेत. ‘वसुधैव कुटुम्बकम्’, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेच्या पुनर्जागरणाचा, त्याप्रति पुन्हा वचनबद्धता व्यक्त करण्याचा आणि ती प्रतिबिंबित करण्याचा हा क्षण आहे. 
गेल्या वर्षी भारताने ही जबाबदारी स्वीकारली तेव्हा जग आव्हानांनी ग्रासले होते. कोरोनाच्या साथीतून सावरण्याची धडपड, हवामान बदलविषयक धोके, आर्थिक अस्थिरता आणि विकसनशील राष्ट्रांच्या डोक्यावरचा कर्जाचा प्रचंड बोजा! संघर्ष आणि स्पर्धेच्या अशा स्थितीत  परस्पर सहकार्याला फटका बसला आणि प्रगतीत अडसर निर्माण झाला.

जी २०चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारताने जगाला मानवकेंद्रित प्रगतीकडे जाणारा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काय विभाजित करते यापेक्षा आपल्याला काय एकत्र आणते,  याचे स्मरण जगाला करून देण्याचा भारताचा उद्देश होता.  सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृतिकेंद्रित आणि निर्णायक - या चार शब्दांनी जी २० परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारताचा दृष्टिकोन स्पष्ट केला. जी २० सदस्यांनी एकमताने स्वीकारलेले ‘नवी दिल्ली घोषणापत्र’ ही भारताच्या वचनबद्धतेची साक्ष ठरली.

जी २०चे कायम सदस्य म्हणून आफ्रिकन संघाच्या समावेशाने ५५ आफ्रिकी देश या मंचाशी जोडले गेले  आणि या मंचाचा  विस्तार जागतिक लोकसंख्येच्या ८०% पर्यंत पोहाेचला. त्यामुळे जागतिक आव्हाने आणि संधींवर अधिक व्यापक संवादाला चालना मिळाली आहे.

भारताने दोन टप्प्यांमध्ये  बोलावलेल्या ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’ने बहुपक्षीयतेची नवी पहाट उजाडली. अशा प्रकारची परिषद प्रथमच आयोजित केली गेली. जगाच्या दक्षिणेकडील विकसनशील देशांच्या चिंता भारताने आंतरराष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणल्या. जी २०च्या आयोजनात  भारताच्या देशांतर्गत दृष्टिकोनाचाही अंतर्भाव होऊन   हे अध्यक्षपद  जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला साजेसे ‘लोकांचे अध्यक्षपद’ बनले. ‘जन भागीदारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून भारताची जी २० अध्यक्षता देशातल्या १.४ अब्ज नागरिकांपर्यंत पोहोचली.    आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, पर्यावरणीय शाश्वतता  आणि यासह परस्परसंबंधित मुद्यांवर, वास्तवदर्शी, कृतिभिमुख दृष्टिकोनासह  भारताने  जी २०- २०२३ कृती आराखडा मांडला.  

आधार, यूपीआय  आणि डिजिलॉकर यासारख्या डिजिटल नवकल्पनांचा क्रांतिकारक प्रभाव अनुभवलेल्या भारताने आपल्या शिफारशींमध्ये निर्णायक भूमिका बजावली. जागतिक तांत्रिक सहकार्यातील ही एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे.  १६ देशांमधील ५० हून अधिक  डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असलेले हे भांडार ग्लोबल साऊथ देशांना  सर्वसमावेशक प्रगतीचे मार्ग खुले करण्यात,  डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आणि त्या अद्ययावत राखण्यात साहाय्य करेल.

जी २०च्या ‘नवी दिल्ली घोषणापत्रा’त २०३० पर्यंत जागतिक अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या सोबतच जागतिक जैव इंधन सहकार्याची स्थापना तसेच हरित हायड्रोजनला एकत्रित प्रोत्साहन देऊन अधिक स्वच्छ, अधिक हरित जग निर्माण करण्याची जी २० देशांची महत्त्वाकांक्षा आकाराला आली आहे.

शाश्वत विकासपूरक जीवनशैली हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. भारताच्या पुरातन शाश्वत परंपरांचा जगाला लाभ मिळू शकतो. शाश्वत भवितव्याच्या निर्मितीसाठी विकसनशील देशांनी ठरवलेली २०३० पर्यंतची राष्ट्रीय योगदाने पूर्ण करण्यासाठी ५.९ ट्रिलियन डॉलर्स इतक्या रकमेची गरज असल्याचे जी २० संघटनेने मान्य केले आहे. यासाठी लागणारी प्रचंड संसाधने बघता, जी २०ने अधिक चांगल्या, मोठ्या आणि अधिक कार्यक्षम बहुआयामी विकास बँकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

लिंगभाव समानता या घोषणापत्राच्या केंद्र स्थानी आहे, त्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी महिला सक्षमीकरणासाठी एक समर्पित कार्यगट बनविण्यात येणार आहे. धोरण सुसंगतता, विश्वासार्ह व्यापार आणि  हवामानबदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी अधिकाधिक, विश्वासार्ह प्रयत्न  हा ‘नवी दिल्ली घोषणापत्रा’चा आत्मा आहे.

भारताच्या जी २० अध्यक्षपदाच्या काळात भूराजकीय मुद्दे आणि त्यांचे आर्थिक विकास तसेच विकासावर होणारे परिणाम यावर चर्चा घडून आल्या. दहशतवाद आणि निरपराध नागरिकांच्या अविचारी हत्या मान्य असणार नाहीत आणि आपण ‘झिरो टॉलरन्स’ या धोरणाने त्यांचा सामना केला पाहिजे. शत्रुत्व न बाळगता मानवतेची कास धरली पाहिजे आणि हा युद्धाचा काळ नाही, याचा पुनरुच्चार केला पाहिजे.

आपल्या जी २० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने विलक्षण कामगिरी केली याचा मला आनंद आहे. आपण बहुपक्षीयतेचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित केले, ग्लोबल साउथचा आवाज जगाच्या व्यासपीठावर आणला, विकासाच्या धोरणांचे नेतृत्व केले आणि जगभरात महिला सक्षमीकरणासाठी लढा दिला.    
आता भारत जी २०चे अध्यक्षपद ब्राझीलला सुपुर्द करत आहे. मानवता, शांतता आणि समृद्धीसाठी भारताच्या अध्यक्षतेखाली उचलल्या गेलेल्या एकत्रित पावलांचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात जाणवत राहतील, हे नक्की!

Web Title: India's G20 Presidency: In Search of Eternal Dreams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.