या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..!

By विजय दर्डा | Published: February 19, 2024 08:17 AM2024-02-19T08:17:19+5:302024-02-19T08:19:26+5:30

प्रश्न केवळ इम्रान खान यांच्या भविष्याचा नाही, तर अजूनही आयएसआय आणि लष्कर या दोघांच्या कचाट्यात घुसमटणाऱ्या पाकिस्तानचाही आहे!

editorial Pakistan Election Imran Khan | या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..!

या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..!

डॉ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

'आपल्याला निवडून आणण्यासाठी हेराफेरी केली गेली,' अशी कबुली देऊन एखाद्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर आपली जागा सोडून दिली, असे उदाहरण जगभरातल्या लोकशाहीच्या इतिहासात मी तरी कधी वाचलेले नाही! परंतु, पाकिस्तानमध्ये असे घडले आहे. निवडणूक आयोगाने जमीयत-ए-इस्लामीचे उमेदवार हाफिज नईम उर रहमान यांना विजयी घोषित केले; परंतु ते म्हणाले, 'मला निवडून आणण्यासाठी हेराफेरी केली गेली आहे! आपल्याला केवळ २६ हजार मते मिळाली आणि इम्रान खान यांची पार्टी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या पाठिंब्याने निवडणूक लढत असलेले स्वतंत्र उमेदवार सैफ वारी यांना ११ हजार मते मिळाली,' असा दावा त्यांनी केला. 'आयोगाने सैफ वारी यांना केवळ ११ हजार मते दाखवून पराभूत घोषित केले. मला असा विजय अजिवात नको आहे!' असे रहमान यांचे म्हणणे आहे. 

 पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने रहमान यांचे आरोप फेटाळले असले तरी देशभरात याचीच चर्चा चालू आहे. आयएसआय आणि लष्कर यांच्या कचाट्यात सापडलेल्या निवडणूक आयोगाने किती ठिकाणी अशी हेराफेरी केली असेल यावर लोक बोलत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर गडबड, गोंधळ होऊनही इम्रान खान यांच्या पक्षाने स्वतंत्र उमेदवारांच्या रूपात सर्वाधिक जागा मिळवल्या असतील तर त्याचा स्पष्ट अर्थ एवढाच की, सध्या पिंजऱ्यात असलेल्या इम्रान खान नावाच्या सिंहाची डरकाळी पाकिस्तानमध्ये घुमते आहे. 

इम्रान खान या व्यक्तीची प्रकृती आणि प्रवृत्ती मी ओळखतो. तो खेळाडू होता तेव्हाही त्याची भेट व्हायची आणि नंतर राजकारणात आल्यावरही अनेकवेळा संवाद झाला. पाकिस्तानला पुढे नेण्याची जिद्द बाळगूनच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. अन्यथा व्यक्तिगत आयुष्यात त्यांचे उत्तम चालले होते. भारतामध्ये २०१४ सालच्या निवडणुकीत ज्याप्रकारे तरुण मतदार, उद्योगविश्व आणि सामान्य माणसे नरेंद्र मोदी यांच्या मागे उभी राहिली, त्याचप्रकारे २०१८ मध्ये पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांनी इम्रान खान यांना साथ दिली.

इम्रान यांनी आपल्या आईच्या नावाने पाकिस्तानमध्ये सर्वांत उत्कृष्ट इस्पितळ उभे केले. तेथे कर्करोगापासून ते अनेक आजारांवर मोफत उपचार होतात. अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. जगभरात नावाजल्या जातील, अशा संस्था पाकिस्तानात उभ्या राहाव्यात, देशात प्रत्येक हाताला काम मिळावे, असे त्यांना वाटे. या वाटचालीत भारताने आपल्याला मदत करावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे समर्थक आजही म्हणतात, 'भारताने आपल्या राजकारणात इम्रान यांना कधी समजून घेतलेच नाही.' इम्रान आपल्या हातचे बाहुले होईल, असे सुरुवातीला लष्कर आणि आयएसआयला वाटले होते; पण इम्रान यांचा सूर्य वरती चढू लागताच दोघे नाराज झाले इम्रान अमेरिकेबरोबर बरोबरीचे नाते ठेव इच्छित होते. चीनला वाटे, त्यांनी आपल्या हो ला हो करावे. तेहरीके तालिबानची इच्छा होती इम्रानने त्यांच्याशी जुळवून घ्यावे; परंतु इम्रान यांनी नकार दिला. परिणामी, त्यांना कारागृहात पाठविण्याचे षड्यंत्र रचले गेले आणि सत्तेपासून बेदखल करण्यासाठी नवाज शरीफ आणि भुत्तो यांनी हातमिळवणी केली. नवाज यांचे बंधू शाहबाज पंतप्रधान झाले. वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी ठरलेले नवाज खरं तर तुरुंगात जायचे; परंतु ते निर्दोष ठरले आणि ऑगस्ट २०२२ मध्ये इम्रान खान गजाआड झाले.

इम्रान यांना निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या प्रकरणांत ३१ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. परंतु, या वाघाच्या डरकाळीची गंभीर चिंता लष्कराला कायम राहिली. म्हणून इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले गेले, इतकेच नव्हे तर निवडणूक चिन्हही जप्त केले गेले. समजा, एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल, तर संपूर्ण पक्षाला अपात्र कसे ठरवता येईल? परंतु लष्कराने तसे केले. कारण इम्रान खान यांनी जनजागृतीची मशाल पेटवली होती. हुकुमशाह अशा मशालींना घाबरतात. इम्रान त्याचीच शिकार झाले.

तसे पाहता इम्रान कधीही हार मानणारा खेळाडू नव्हता. तो प्रहार करणारा गोलंदाज आणि फलंदाज । जोवर विकेट पडत नाही किंवा चेंडू सीमापार जात नाही, तोपर्यंत स्वस्थ राहण्याचा त्याचा स्वभाव नाही. त्यांचे राजकारणही तसेच आहे. त्यांनी आपल्या लोकांना सांगितले, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवा। इम्रान यांच्या लोकांना निवडणूक प्रचारापासून रोखले गेले, अनेक अडथळे उभे करण्यात आले. परंतु, पाकिस्तानचा तरुणवर्ग इम्रान यांच्या हाती सत्ता देऊ इच्छित होता. पराभूत झालेल्या उमेदवारांना निवडून आलेले दाखविण्यासाठी प्रचंड हेराफेरी करूनही जेव्हा निकाल समोर आले तेव्हा सगळे थक्क झाले.

२६५ सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीत पीटीआयचा पाठिंबा असलेले ९३ उमेदवार निवडून आले. अर्थातच त्यांचा दावा यापेक्षा जास्त जागा मिळाल्याचा आहे. नवाज यांचा पक्ष पीएमएल (एन)ला ७५ जागा आणि भुत्तो यांच्या पीपीपीला केवळ ५४ जागा मिळू शकल्या. महिला आणि बिगरमुसलमानांसाठी आरक्षित ७० जागांपासून इम्रान यांचा पक्ष वंचित राहणार असल्याने तूर्तास ते सत्तेत येण्याची शक्यता दिसत नाही, परंतु, इम्रान खान यांनी लोकांमध्ये निर्माण केलेल्या जागृतीचा परिणाम असा की, पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शने होत आहेत. लोकांना इम्रान सत्तेवर हवे आहेत; परंतु काय करणार? आपल्या शेजाऱ्यांचे नशीबच खराब। प्रगतीच्या रस्त्यावर पाऊल ठेवण्यासाठी या शेजाऱ्याला आणखी किती काळ वाट पाहावी लागणार, कोण जाणे। खुदा पाकिस्तानच्या जनतेचे रक्षण करो.

Web Title: editorial Pakistan Election Imran Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.