दानवे-खोतकरांची ‘साखरपेरणी’

By सुधीर महाजन | Published: June 12, 2018 01:09 PM2018-06-12T13:09:48+5:302018-06-12T13:09:48+5:30

जो सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपच्या सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडला आहे. या दोघांमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याला तोंडसुख घेणे, असे म्हणावे का? कारण असे बोलून या दोघांचेच समाधान होईल

Danwe-Khotkar's 'sugar plan' | दानवे-खोतकरांची ‘साखरपेरणी’

दानवे-खोतकरांची ‘साखरपेरणी’

Next

नेहमी नेहमी रीतभात पाळायची, संबंध टिकवायचे, व्यवहार सांभाळायचे; पण शेवटच्या वर्षात कलागती उकरून काढायच्या. एकमेकांच्या नावांचा उद्धार करीत शिमगा खेळायचा, दूषणे द्यायची याला बतावणी म्हणावी की निरुपण, असे कोडे सामान्य माणसाला पडते. तो गोंधळून जातो आणि कोणतीही जाहिरातबाजी न करता किंवा कार्यक्रमाचा धडाका न उडवता चर्चेत राहण्याचा उत्तम मार्ग आहे जो सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपच्या सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडला आहे.
या दोघांमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याला तोंडसुख घेणे, असे म्हणावे का? कारण असे बोलून या दोघांचेच समाधान होईल. कारण ज्यावेळी हे इकडे एकमेकांचे उणे-दुणे काढत होते त्याच वेळी तिकडे मुंबईत भाजपच्या गोटात आणि ‘मातोश्री’वर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची जय्यत तयारी चालू होती. म्हणजे एकीकडे मनोमिलनाचे वातावरण तयार केले जात असताना त्याच पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यमंत्री एकमेकांवर दुगाण्या झाडताना दिसत होते म्हणजे या दोन पक्षांत नेमके चालले आहे तरी काय? अमित शहा-उद्धव ठाकरे यांची भेट खरी मानायची की, दानवे-खोतकरांमधील शिमगा, हे कोडे सर्वांनाच पडले आहे. दानवे म्हणतात, हा पक्षाचा वाद नसून, आमचा आपसातील जालना जिल्ह्यातील वाद आहे, म्हणजे जिल्ह्याच्या बाबतीत याला घरगुती बाब म्हटली, तर उद्या लोकसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढल्या, तर जाहीर सभांमधून हेच खोतकर दानवेंच्या उमेदवाराची तरफदारी करताना दिसतील, असेच म्हणावे लागेल आणि ती युतीची गरज आहे, अशी बतावणीही करतील.

या दोघांच्या भांडणाचे कारण वेगळेच आहे. दानवेंच्या विरोधात लोकसभेसाठी उभे राहण्याची तयारी सध्या खोतकर करीत आहेत, असे दानवेच म्हणतात. समजा असे घडलेच, तर दानवेंसाठी मोठी अडचण ठरणार. कारण २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दानवे सेनेमुळेच निवडून आले आणि २०१४ साली मोदी लाटेत तरून गेले. खोतकरांच्या या म्हणण्यात तथ्य आहे. मतदारसंघाचा विचार केला, तर जालना लोकसभा मतदारसंघाची आजची परिस्थिती लक्षात घेता भोकरदन आणि बदनापूर या दोन मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. भोकरदनमध्ये दानवेंचे चिरंजीव संतोष हेच आमदार आहेत, तर बदनापूरमध्ये नारायण कुचे हे दानवे समर्थक समजले जातात. जालना विधानसभा मतदारसंघ हा अर्जुन खोतकरांचा आहे आणि जालना नगर परिषदेची सत्ता काँग्रेसकडे. याच लोकसभा मतदारसंघात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ येतो. तेथे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी दानवेंचे बिनसल्याने ते विरोधात. त्यामुळेच दानवेंची राजकीय अडचण वाढल्याने सध्याचे चित्र आहे. जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर आणि राजेश टोपेंचा घनसावंगी मतदारसंघ जरी परभणी लोकसभा मतदारसंघाचे भाग असले तरी हे दोघेही दानवेंसाठी अडचण समजले जातात. या पार्श्वभूमीवर या दोघांमधील वादाला महत्त्व आहे. 

या दोघांनी एकमेकांवर जे आरोप केले ते पाहता, खरे तर दोघांनी एकमेकांवर गुन्हेच दाखल करायला पाहिजे होते, असे हे गंभीर आरोप आहेत. एकमेकांवर जाहीर आरोप केला की, आपण चर्चेत राहतो, विरोधक मागे पडतात आणि पुढे जनमत बनवणे सोपे जाते, असे एक प्रचाराचे सूत्र असते, तर ही साखरपेरणी म्हणावी काय, असाही प्रश्न पडतो. कारण खोतकरांच्या उमेदवारीची भाषा दानवेच वारंवार करतात; पण आपण तर पक्षप्रमुखाचा आदेश पाळणारे आहोत, असे उत्तर खोतकर देतात. दुसरीकडे हा आमचा वैयक्तिक जिल्हा पातळीवरील वाद आहे, असेही दानवे म्हणतात, तर प्रश्न असा की, हा शिमगा नेमका कशासाठी आणि कोणासाठी, काहीही घडले तरी रंगाची उधळण तुमच्यावरच होणार आहे. 
 

Web Title: Danwe-Khotkar's 'sugar plan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.