...तर हजारो गोळ्या झाडल्या असत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:50 AM2019-02-12T11:50:19+5:302019-02-12T11:53:38+5:30

पं. नेहरूंनी गोळवलकर गुरुजींना अखंड भारताचे आश्वासन देऊन हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये फूट पाडली. परिणामी, काँग्रेस विजयी झाल्यानंतर देशाचे विभाजन झाले आणि या करारावर हस्ताक्षर करणारे गांधी हिंंदू महासभेच्या दृष्टीने व्हिलन बनले. हिंदू राजकारण नष्ट करणे, हा नेहरूंचा कट होता आणि त्यासाठी गांधींचा वापर केला गेला.

 ... could have shot thousands of bullets on Mahatma Gandhi | ...तर हजारो गोळ्या झाडल्या असत्या

...तर हजारो गोळ्या झाडल्या असत्या

Next
ठळक मुद्देगांधीवाद काय आहे, हे जाणून घेण्यासाठी गांधी यांच्या चरित्राचा दोन्ही बाजूंनी अभ्यास करणे गरजेचे आहे. महात्मा ही उपाधी मिळूनही ब्रिटिश सरकारचे एजंट म्हणून वावरणा-या नेहरू परिवाराच्या दबावाखाली गांधी वाहवत गेले आणि हिंदू राजकारण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस विजयी झाल्यानंतर देशाचे विभाजन झाले आणि या करारावर हस्ताक्षर करणारे गांधी हिंंदू महासभेच्या दृष्टीने व्हिलन बनले. हिंदू राजकारण नष्ट करणे, हा नेहरूंचा कट होता आणि त्यासाठी गांधींचा वापर केला गेला

 - प्रमोद पंडित जोशी 

दि. ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तूलने गोळ्या झाडल्या. ती एक प्रतिक्रिया असली, तरी तो मूर्खपणा होता. मुळात गांधीवाद काय आहे, हे जाणून घेण्यासाठी गांधी यांच्या चरित्राचा दोन्ही बाजूंनी अभ्यास करणे गरजेचे आहे. गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आजवर कोणाला समजलेले नाही, त्यामुळे ते नेहमीच वादात राहिले. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि विभाजन हे गांधींचे मूळ धोरण होते. एकीकडे हरिजनवाद जपायचा आणि दुसरीकडे त्यांच्या होणाऱ्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करायचे, हे वास्तववादी चित्र होते. महात्मा ही उपाधी मिळूनही ब्रिटिश सरकारचे एजंट म्हणून वावरणा-या नेहरू परिवाराच्या दबावाखाली गांधी वाहवत गेले आणि हिंदू राजकारण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच, गांधी विचारांच्या विरोधाला प्रारंभ झाला.

१३ एप्रिल १८८२ ला हिंदू महासभेची स्थापना लाहोरमध्ये झाली. जातीयवाद समूळ नष्ट करणे, जातीयवादामुळे धर्मांतरित होणाºया लोकांचे शुद्धीकरण हे स्थापनेमागचे मूळ उद्दिष्ट होते. महात्मा गांधी १९१३ ला भारतात आले. एप्रिल १९१५ ला हरिद्वारला भरलेल्या कुंभमेळ्यात हिंदू महासभेची अखिल भारतीयस्तरावर स्थापना काँग्रेसच्या नेत्यांनी केली. त्यावेळी संस्थापक सदस्य भारतरत्न पं. मदनमोहन मालवीय आणि पंजाबकेसरी लाला लजपतराय होते. यात जे हिंदुत्ववादी होते, ते लोकमान्य टिळक यांच्या विचारसरणीचे होते. ज्यावेळी हिंदू महासभेची स्थापना केली, त्यावेळी बॅरिस्टर गांधी स्वत: उपस्थित होते. पुढे १९१७ मधील जे चंपारण्य आंदोलन झाले, ते गांधींनी मालवियांच्या सल्ल्यानुसारच केले. गांधी मार्च १९२० पर्यंत हिंदू महासभेबरोबर होते. त्यांनी ब्रिटिश सरकारने आणलेल्या रौलेट अ‍ॅक्ट या क्रांतिकारकांच्या विरोधातील कायद्याविरोधात जनजागरणही केले होते.

१९१९ मध्ये अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर मार्शल लॉ सुरू असतानाही केवळ मोतीलाल नेहरू अध्यक्ष होणार म्हणून ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेला अनुमती दिली होती. या सभेचे हिंदू महासभेचे स्वामी श्रद्धानंद अध्यक्ष होते. लोकमान्य टिळकही या सभेला वाजतगाजत मिरवणुकीच्या माध्यमातून आले होते. परंतु, पार पडलेल्या त्या अधिवेशनात मोतीलाल नेहरूंनी ब्रिटिश सरकारला अनुरूप असलेले कायदे मान्य केले. त्याला लोकमान्य टिळकांनी विरोध केला आणि इथे वादाची ठिणगी पडली. टिळकांना शांत बसवण्यासाठी नेहरूंनी गांधींचा वापर केला, यात ते सफलही झाले. पुढे गांधींना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी नेहरूंनी सी.आर. दास यांंची मदत घेतली. दमदाटी, हत्येची धमकी देऊन आपले पाईक बनवले. यासाठी अ‍ॅनी बेझंट, लोकमान्य टिळक यांना बंदिवासात टाकून कसे बेजार केले, याची उदाहरणे दिली गेली. या आशयाची पत्रे मोतीलाल यांनी पुत्र जवाहरलाल नेहरूंना लिहिली होती. १९२५ ला बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाल्यावर त्याच मंचावर हिंदू महासभेचे अधिवेशन झाले. यामध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे भाई परमानंद छिब्बर यांनी राजनीतीचे हिंदूकरण करण्यासाठी काँग्रेसपासून फारकत घेत हिंदू महासभेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध होते, तेव्हा गांधी त्यांना भेटायला गेले होते.
सावरकरांच्या सुटकेचे प्रयत्न होत होते, त्यासाठी हस्ताक्षर अभियानही चालवले गेले. परंतु, ब्रिटिश एजंट म्हणून काम करणारा नेहरू परिवार सावरकरांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी सांगत होता. दि. १० मे १९३७ ला सावरकर सुटले आणि लोकमान्य टिळक गटाच्या काँग्रेसमध्ये दाखल झाले. दि. २७ डिसेंबर १९३७ ला अहमदाबाद कर्णावती येथे पार पडलेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकरांना अध्यक्षपद मिळाले. भाई परमानंद यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असा आग्रह सावरकरांनी धरला. आॅक्टोबर १९३७ ला मुस्लिम लीगने त्यांच्या लखनौ अधिवेशनात विभाजनकारी प्रस्ताव पारित केला. भारत एकसंध होतोय आणि संघराज्य संकल्पनेला समर्थन करावे, असा प्रस्ताव परमानंद यांनी गांधींपुढे ठेवला. परंतु, नेहरूंनी त्याला संमती दिली नाही. परिणामी, देशाची वाटचाल विभाजनाकडे सुरू झाली.

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही गांधींनी ब्रिटिशांनो तुम्ही जा, पण सैन्य आणि प्रशासन ठेवा, अशी मागणी केली. १९४६ साली जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षपदासाठी कोणताही प्रस्ताव नव्हता. सरदार पटेल यांना मान्यता मिळाली होती. परंतु, दबावाच्या राजकारणात नेहरूंनाच निवडले गेले. नेहरूंनी गोळवलकर गुरुजींना अखंड भारताचे आश्वासन देऊन हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये फूट पाडली. गांधी हत्येची काही प्रमुख मंडळींना पूर्वकल्पना होती. परंतु, नथुराम गोडसेंना बळीचा बकरा बनवले गेले. हिंदू राजकारण नष्ट करणे, हा नेहरूंचा कट होता आणि त्यासाठी गांधींचा वापर केला गेला. गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी जो प्रकार घडला, त्याचे समर्थन होणार नाही. गोळ्या झाडून गांधीवाद संपुष्टात येणार असेल, तर अशा हजारो गोळ्या याआधीही झाडल्या गेल्या असत्या.
(लेखक अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)
- शब्दांकन : प्रशांत माने

Web Title:  ... could have shot thousands of bullets on Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.