औरंगाबाद-जळगाव मार्गाचे काम बंद, चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी नसल्यामुळे अडचण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 07:05 AM2018-07-11T07:05:23+5:302018-07-11T07:05:40+5:30
जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठ्यापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यांत ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठ्यापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यांत ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ते काम बंद ठेवले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली या रस्त्याचे काम सुरू असून, विभागातील अभियंतेदेखील त्या कामाच्या गतीबाबत नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचा मूळ प्रस्ताव द्विपदरीच होता. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’च्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने भूमिपूजनाच्या दिवशी त्या रस्त्याच्या कामाला चौपदरीकरणाची तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र अंतिम मंजुरी अजून दिलेली नाही. एनएचएआय आणि एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडीची नॅशनल हायवेची यंत्रणा द्विपदरी रस्ता करण्यासाठी तयार होती; परंतु जनरेट्यामुळे त्या रस्त्याचे काम चौपदरीकरणातून करण्याचे ठरले. मात्र, वाढीव निधीसाठी तातडीने मंजुरी मिळाली, तरच ते काम पुढे सरकेल, असे सूत्रांनी सांगितले.
तीन टप्प्यांत मिळाली मंजुरी
पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी, तर तिसºया टप्प्यात ३१६ कोटी, अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. १ हजार कोटींची वाढीव तरतूद नव्याने होण्याची शक्यता आहे. त्या तरतुदीला अंतिम मंजुरी नसल्यामुळे कंत्राटदाराने काम ठप्प ठेवून हात आखडता घेतला आहे.
आठ ते दहा दिवसांत मंजुरी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी दावा केला की, आठ ते दहा दिवसांत चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. मंजुरीसाठी लागणारा पूर्ण प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच काम गतीने पुढे सरकेल.