निसर्गाची ‘भेट’ केरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:51 AM2017-12-28T02:51:13+5:302017-12-28T02:51:46+5:30

आकाशातून पाहिले तर हिरवा गालिचा पसरल्यासारखे दिसणारे ‘केरळ’ प्रत्यक्षातही तितकेच सुंदर आहे. म्हणूनच ‘गॉड्स ओन कंट्री’ असे ब्रीदवाक्य केरळसाठी देण्यात आले आहे. ‘निसर्गाने घडवलेले क्षेत्र’ अशीही केरळची स्वतंत्र ओळख आहे.

Nature 'gift' Kerala | निसर्गाची ‘भेट’ केरळ

निसर्गाची ‘भेट’ केरळ

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे
आकाशातून पाहिले तर हिरवा गालिचा पसरल्यासारखे दिसणारे ‘केरळ’ प्रत्यक्षातही तितकेच सुंदर आहे. म्हणूनच ‘गॉड्स ओन कंट्री’ असे ब्रीदवाक्य केरळसाठी देण्यात आले आहे. ‘निसर्गाने घडवलेले क्षेत्र’ अशीही केरळची स्वतंत्र ओळख आहे. देशातल्या हिल स्टेशनपैकी हे एक सर्वांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे, ते केवळ निसर्ग संपत्तीच्या जोरावर.
अथांग समुद्रकिनारा आणि घनदाट झाडींमध्ये दडलेले डोंगर हे केरळचे वैभव. केरळमध्ये प्रत्येक ऋु तूमध्ये वेगळेपण असल्याने त्या ठिकाणी पर्यटकांची सतत रीघ सुरूच असते; परंतु पावसाळ्यात मुसळधार कोसळणाºया धारांमुळे भटकंती करणे अवघड असल्याने हिवाळा अथवा उन्हाळ्यात केरळला बहुतेकजण भेट देतात. या पर्यटकांच्या आवडीच्या ठिकाणांमध्ये कोची, मुनार, ऐरणाकुलम, अलप्पुझा, कोलाम, वायांद ही ठिकाणे, तर विमानतळामुळे कोचीला मध्यवर्ती ठिकाणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन ते तीन दिवसांसाठी केरळ भटकंतीला जाणाºयांसाठी मुनार आणि ऐरणाकुलम ही दोन ठिकाणे सर्वोत्तम. बॅकवॉटरचा आनंद घेण्यासाठी अलप्पुझाला अवश्य भेट द्यावीच लागेल. प्राचीन काळापासून जतन झालेले हाउसबोट हे तिथले विशेष आकर्षण. बोटीत मुक्काम करून मनसोक्तपणे पाण्यामध्ये भटकंती करताना दिवस कसा जातो, हेदेखील कळत नाही. अशा वेळी तुम्ही समुद्री मेवा(सी फुड्स)चे खवय्ये असाल, तर अधिकच मज्जा. तर रोजच्या दगदगीपासून सुटकारा म्हणून भटकंतीला जात असाल, तर मुनार सारखा दुसरा पर्याय नाही. त्या ठिकाणी लोकवस्तीपासून काहीसे दूर, घनदाट झाडीमध्ये राहण्याची सोय हमखास होईल. जिथे तुम्ही निसर्गाला साद घालू शकता, व मनमुराद गप्पाही मारू शकता. सूर्याची किरणेही जमिनीपर्यंत पोहोचू देणार नाहीत इतकी उंच झाडी, त्याखालून दिवसाही चालताना वाट शोधावी लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी जंगल सफरीचा आनंद घ्यायची संधी सहसा कोणी सोडत नाही. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा असे ठिकाण नक्कीच प्रसन्न करेल.
भटकंती बरोबरच केरळची खाद्यसंस्कृतीही अनेकांना आकर्षित करते. त्याकरिता अद्यापही प्राचीन संस्कृती जोपासणाºया कुमाराकोम, कोवलाम, थेक्डी या ठिकाणी अवश्य भेट द्या. केळीच्या पाणावर जेवण जेवण्याची मज्जा काही वेगळीच. भातासोबत भाजी किंवा मासे हे तिथले आवडीचे खाद्य. सर्वत्र कोकोची झाडे असल्याने जागोजागी चॉकलेटचे उत्पादन होते. त्यापैकी बहुतेक चॉकलेट्स देशभरासह विदेशातही पाठवली जातात. तर प्रत्येक डोंगरावर चहाचे मळे असल्याने दुरून डोंगरावर हिरवा गालिचाच पसरल्याचा भास होतो. हेच दृश्य अनेकांना भावते व ते केरळच्या दिशेने धाव घेतात. चहूबाजूने चहाच्या मळ्यांमधून जाणाºया रस्त्यावरील प्रवास अविस्मरणीय अनुभव देऊन जातात. त्यामुळे चहाच्या मळ्याने व्यापलेल्या डोंगरावरील प्रत्येक वळण फोटो पॉइंट बनले आहेत.
संस्कृतीने नटलेले ग्रामीण जनजीवन, हिल स्टेशन, जंगल सफारी, बॅक वॉटर हे सर्व काही अवघ्या केरळमध्ये अनुभवता येते. निसर्गाने भरभरून जैवसृष्टी दिलेली असल्याने तज्ज्ञांकडून केरळला ‘लँड आॅफ आयुर्वेदा’ अशी ओळख प्राप्त झाली आहे. वेगवेगळ्या वनौषधींवर संशोधन करून औषधनिर्मिती तिथे केली जाते. त्यामुळे भटकंतीसाठी गेलेला पर्यटकही सहज म्हणून एखादी आयुर्वेदिक थेरपी घेऊन तृप्त होणारच. उंचावरील ठिकाणांमध्ये देवीकुलाम आणि कोट्यममधील इलवेझापूंचिरा व्हॅली अत्यंत प्रसिद्ध. त्यांच्या टोकावर गेल्यानंतर ढगांच्याही काहीसे वर आल्याचा भास होतो.नजर जाईल तिथपर्यंत दूरदूरवर केवळ जंगल आणि जंगलच पाहायला मिळते. यामुळे निसर्गावर प्रेम करणारे हमखास अशा ठिकाणांना भेट देतात. ज्यांना प्रवासात वेळ घालवायचा नाही, त्यांच्यासाठी केरळला जाण्याकरिता विमानाचा पर्याय आहे. त्याशिवाय केरळ हे रेल्वेने मुंबईला जोडले गेले असल्याने खिशाला परवडेल, अशी सहल होऊ शकते. निसर्गाचे जतन झाल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसºया क्र मांकाचे राज्य बनले आहे. तिथले सृष्टिसौंदर्य पाहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो नागरिक केरळमध्ये येतात. निसर्गाच्या बाबतीत जागृक असलेल्या या राज्यातील नागरिक तितकेच साक्षरही आहेत. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्याने केरळ हे भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य म्हणून ओळखले जाते. यामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केरळची युवा पिढी देश-विदेशात स्थायिक झालेली आहे. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून उपलब्ध दळणवळण साधनांमुळे कोची हे महत्त्वाचे शहर बनले आहे.

Web Title: Nature 'gift' Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.