‘आतला आवाज ’

By admin | Published: January 9, 2017 12:53 AM2017-01-09T00:53:18+5:302017-01-09T00:53:18+5:30

‘आतला आवाज ’

'Inner voice' | ‘आतला आवाज ’

‘आतला आवाज ’

Next


डिसेंबरचा महिना सुरू झाला की, प्रत्येकाच्या मनाला नवीन वर्षाचे वेध लागतात. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तसेच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. पण, खरंच काय दिलं या २0१६ वर्षानं आपल्याला? महागाई, बलात्कार, जातीय दंगली, शेतकरी आत्महत्या हे सामाजिक प्रश्न कालही होते, आजही आहेत, आणि उद्याही कदाचित ते तसेच असतील. ‘असं का? ही परिस्थिती कधीच बदलणार नाही?’ मी स्वत:लाच विचारलं. आणि मी विचारात असतानाच कुणीतरी माझ्या कानात कुजबुजलं ‘एक्सक्यूज’मी.’ मी वळून बघितलं तर माझ्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. घरात मी एकटीच होते. कोण बोललं मग? मी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो आवाज माझाच आतून येत असल्याचा भास आला. अगदी खोल मनाच्या अंतरंगातून... तो मला म्हणाला, ‘आताच तू म्हणालीस की, या सरत्या वर्षानं मला काय दिलं? पण, मी तुला विचारतो की, तू तरी काय दिलंस बरं या वर्षाला?’ मी थोडी गोंधळलेच. खरंतर निरुत्तरच झाले. पण, ‘आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय,’ मी म्हणाले. ‘ठीक आहे. ऐक मग. महागाई, बलात्कार, जातीय दंगली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारखी कोणतीही समस्या असो, ती सोडविण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे, तितकीच तुझ्यासारख्या सामान्य नागरिकाचीही आहे.’ म्हणजे? माझा काय संबंध या सगळ्याशी? मी म्हणाले. ‘अगं, असं कसं म्हणतेस, हा विचारच या समस्या निवारण करण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर स्वच्छता अभियानाचंच घे. आज अनेक शहरांत अनेक गट तसेच मंडळं यासाठी कार्यरत आहेत. पण, तरीही अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे तसंच आहे. स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असलेले आणि याविषयी संपूर्ण उदासीन असलेले याचं प्रमाण आजही खूपच व्यस्त आहे.’ ते ऐकल्यावर मलाही आठवलं, माझ्या घरातल्या कचऱ्याचं खत करण्याचा प्रकल्प मी सुरू केला. पण, बाहेर
गेल्यावर नकळतपणे मीही या कचऱ्यात भर घालत होते. पुण्याला
जाताना वाटेत घेतलेल्या बटाटेवड्याचा कागद गाडीची काच खाली करून मी रस्त्याच्या कडेला टाकला होता. तिथं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्यात मी एक कागद टाकला तर बिघडलं कुठं? ‘अगं हाच विचार प्रत्येकजण करतं आणि ही समस्या सुटतच नाही. इतर समस्यांचंही तसंच आहे. पर्यावरण
रक्षणासाठी झाडं लावणं जितकं जरुरीचं आहे तितकंच जुन्या झाडांचं रक्षण करणं,’ तो आवाज म्हणाला. परवाच आमच्या गल्लीतली जुनी झाडं कापल्यावर भकास झालेलं वातावरण मला आठवलं. कुणीतरी पुढं होऊन त्यांना जाब विचारावा असं वाटलं होतं. ‘पण मग तूच का पुढं झाली नाहीस?’ त्या आवाजानं मला विचारलं. ‘अगं, बलात्काराची घटना असो किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवतो त्यांच्या मनाचा विचार कितीजण करतात? त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात?’ तो आवाज मला जाब विचारत होता. आता मलाही जाणवलं ‘खरंच, या घटना आपण थांबवू शकत नाही. पण, त्या प्रसंगात त्या व्यक्तीला, कुटुंबाला मानसिक तसेच आर्थिक आधार नक्कीच देऊ शकतो. त्या विचारानंही मला खूप बरं वाटलं. त्याचवेळी ही जाणीव याआधी कधीच कशी झाली नाही?’ असा प्रश्न पडला.
‘खरं आहे तुझं. पण, याआधी असा निवांत वेळ, अशी शांतता तरी गेल्या कित्येक दिवसांत तू अनुभवली होतीस का? इतरांशी राहू दे. पण, स्वत:शी तरी संवाद साधला होतास का तू? आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळच असतात. पण, त्यासाठी एखाद्या दिवशी थोडा वेळ स्वत:ला द्यायला हवा. स्वत:शी थोडा संवाद, आत्मपरीक्षण करायला हवं. मनावरची जळमटं व साठलेली माती दूर करून आपलाच खोल हरवलेला आवाज ऐकायला हवा... माणुसकीचा झरा आटण्यापूर्वी शोधायला हवा... स्वच्छता अभियान आधी मनामनात जागवायला हवं... मग येणाऱ्या वर्षात अनेक गोष्टी नव्या असतील...काही नव्यानं गवसतील... नक्की. अगदी नक्की.’ तो आवाज मला आश्वत करीत होता आणि मी माझ्या विचारात हरवले होते.
- उज्ज्वला करमळकर

Web Title: 'Inner voice'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.