Ramzan : रमजानला एवढे महत्व का प्राप्त झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 07:00 AM2018-05-28T07:00:00+5:302018-05-28T07:00:00+5:30

इस्लाममध्ये रमजानला एवढे महत्व का? त्याची कुरआनाच्या आधारे दिलेली माहिती:

Why is Ramzan so important? | Ramzan : रमजानला एवढे महत्व का प्राप्त झाले?

Ramzan : रमजानला एवढे महत्व का प्राप्त झाले?

नौशाद उस्मान

रमजान हा सुरुवातीला अरबी कॅलेंडरमधील नवव्या क्रमांकाचा सर्वसामान्य महिन्यासारखा एक महिना होता. मग त्याला एवढे महत्व का प्राप्त झाले? याचे उत्तर कुरआनात सापडते -
कुरआनात अल्लाह सांगतो -
''रमजान तो महिना आहे ज्यात कुरआन अवतरित झाले, जे समस्त मानवांकरिता मार्गदर्शन आणि सत्य - असत्य स्पष्ट करण्याचे मापदंड आहे.'' - कुरआन (२:१८५)
याचा अर्थ रमजानला कुरआनच्या अवतरणामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता हे अवतरण झाले म्हणजे नेमके काय झाले? हे सविस्तरपणे आपण पाहू या-
प्रेषित मुहम्मद सल्लम यांना प्रेषित्व प्राप्त होण्यापूर्वी म्हणजे ते चाळीस वर्षांचे होते त्यावेळी त्यांना या सृष्टीच्या निर्मिकाची तीव्रतेने ओढ लागली होती. ते अल्लाहचे नामःस्मरण, चिंतन-मनन  करण्याकरिता मक्का शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या हिरा गुहेत जाऊन बसायचे. रमजानच्या महिन्यातील अशाच एका रात्री ते त्या गुहेत चिंतन मनन करत असतांना त्यांना ''जीब्रइल'' नावाचे ईशदूत (फरिश्ते) दिसले. फरिश्ते हे अल्लाहचे दूत असतात. त्यांना वेगवेगळे काम अल्लाहने सोपवलेले आहेत. ते नेमके कसे दिसतात, त्यांचे नेमके स्वरूप काय आहे, त्याबद्दल फार जास्त माहिती सापडत नाही. जीब्रइल हे त्यापैकी सर्वात महत्वाचे फरिश्ते मानले जातात. त्यांच्याकडे प्रेषितांपर्यंत अल्लाहचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी असते. असे संदेश ते प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यापूर्वीही आलेल्या अनेक प्रेषितांपर्यंत पोहोचवत होते. 
प्रेषित मुहम्मद सल्लम हे इस्लामचे संस्थापक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांच्यापूर्वीही जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित आलेले आहेत. भूतलावरील पहिले मानव आदम हे इस्लामचे पहिले प्रेषितदेखील होते. त्या प्रेषितांकडेही जीब्रइल हेच ईशदूत येत होते. त्या रात्रीही तेच जिब्रइल अल्लाहचा संदेश घेऊन आले होते. काही इतिहासकार सांगतात कि, त्यांनी सोबत एक प्रकाशमान पटलावर लिहिलेले शब्द दाखवत प्रेषित मुहम्मद सल्लम यांना सांगितले - 
''इकरा (वाचा)''
प्रेषितांनी उत्तर दिले कि, ''मला वाचता येत नाही.'' कारण प्रेषित हे उम्मी (अक्षरशून्य) होते. त्यांचा कुणीही गुरु नव्हता. गुरुविनादेखील मुक्ती शक्य आहे, हे प्रेषितांनीच जगाला कृतीतून शिकविले. जिब्रइल यांनी प्रेषितांना छातीशी घट्ट धरले आणि पुन्हा सांगितले -
''वाचा!''
असे तीनवेळा झाल्यानंतर प्रेषितांनी वाचायला सुरुवात केली. त्या प्रसंगानंतर पुढे कुरआनचा एक एक अध्याय वेगवेगळ्या प्रसंगानुरूप अवतरित होत गेला. अवतरित झाल्यानंतर प्रेषित ते मुखोदगत करून घ्यायचे. अल्लाहने प्रेषितांना कुरआन पाठ करण्याची एक जबरदस्त क्षमता प्रदान केली होती. अध्याय अवतरित होण्याचे तीन प्रकार होते. एक तर फरिश्ता मानवी रूपात येऊन अध्याय सांगायचा, दुसरा प्रकार म्हणजे स्वप्नात अध्याय सांगितला जायचा आणि तिसरा प्रकार म्हणजे अध्याय थेट अल्लाहकडून प्रेषितांच्या हृदयावर अवतरित होत होते. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी फार जड जात होती. कोणतीतरी जड वस्तू विजेसारखी आकाशातून येऊन हृदयावर पडत असल्याचा आभास त्यांना व्हायचा आणि तो अध्याय त्यांच्या मनःपटलावर जणू कोरला जायचा. नंतर तो अध्याय प्रेषित लोकांसमोर पठन करायचे आणि लोकं ते झाडांच्या पानावर, जनावरांच्या चामड्यावर किंवा लाकडांच्या पाटयावर लिहवून घेत होते. पुढे खलिफा उस्मान गनी यांनी एक आयोग नेमून त्या मूळ प्रतीच्या अनेक लिपिबद्ध करून त्याच्या शंभर प्रति जगभरात पाठवून दिल्या. आजही त्या अस्तित्वात आहे. अशाप्रकारे कुरआन रमजान महिन्यात अवतरण्यास प्रारंभ होऊन प्रेषितांद्वारे अल्लाहकडून (भगवंताकडून) भक्तांपर्यंत पोहोचला. पण या ज्ञानरूपी गंगोत्रीची सुरुवात याच रमजानमध्ये झाली होती. याच महिन्यात जगभरात कुराणाचा समता व एकत्वाच्या संदेशाचा जमजम झरा वाहू लागला होता.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
 

Web Title: Why is Ramzan so important?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.