बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:14 AM2019-03-21T00:14:55+5:302019-03-21T00:15:31+5:30

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे.

Water level in Beed district dropped to 7 meters | बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

Next
ठळक मुद्देजल है तो कल है : जलबचतीचा संकल्प करुया, जलपुनर्भरण चळवळीची गरज

बीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. इतर तलाव कोरडेठाक पडले आहेत. परिणामी सध्या टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या ५७० टॅँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली होती. मागील पाच वर्षांतील आॅक्टोबरमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ४ मीटरने घसरण झाल्याचे निदर्शनास आले होते. तर जानेवारीत केलेल्या तपासणीनंतर आॅक्टोबरमधील पाणीपातळी आणखी खोलवर गेल्याचे समोर आले. ही पाणीपातळी एकूण ७ फूट खोलपर्यंत गेली आहे.
मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मार्चचे दहा दिवस तसेच एप्रिल व मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे.
अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्वाचे आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६६ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच ११ तालुके सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.
पाच महिन्यांत तीन मीटर खोली वाढली : पुढचे दोन महिने संकटाचे
आॅक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ४ मीटरने खालावली होती. त्यानंतरच्या पाच महिन्यात आणखी तीन मीटरने भूजल पातळीत घट झाली. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत, तर सोशल मीडियावरूनही थेंब थेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी शपथ अभियान देखील राबविण्यात येत आहे.

Web Title: Water level in Beed district dropped to 7 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.