जिद्दीचा संघर्षमय प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:23 AM2018-03-08T00:23:53+5:302018-03-08T00:24:08+5:30

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद अंगिकारून पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावताना गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच पाणी, शिक्षण व इतर सामाजिक विषयांवर ‘कम्युनिटी पोलिसींग’ निर्माण करण्याचा मानस उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी व्यक्त केला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडला.

Stubborn journey of stubbornness | जिद्दीचा संघर्षमय प्रवास

जिद्दीचा संघर्षमय प्रवास

googlenewsNext

भाग्यश्री बाबूराव नवटके (आयपीएस) -
मराठवाड्यातीलच लातुर जिल्ह्यातील उदगीर येथील भाग्यश्री नवटके या रहिवाशी. उदगीरमधीलच राजर्षी शाहू विद्यालयात त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षण नांदेडला झाले. इंजिनिअरींग शिक्षण सुरू असतानाच सिनीयर्स ‘युपीएससी’ची तयारी करीत होते. आपणही अशी तयारी करून आयएएस, आयपीएस अधिकारी बनू शकतो, हे त्यांनी ठरविले. मनात जिद्द ठेवून त्या युपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्लीला गेल्या. दिवसरात्र अभ्यास केला. दर तीन तासाला पाच मिनीटांचा ब्रेक घेऊन २४ तासांतील १५ तास अभ्यास केला. मध्यमवर्गीय कुटूंबातील असलोत तरी आपणही चांगले अधिकारी बनू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. ४ वर्षे त्यांनी अभ्यास केला. यावेळी त्यांनी पहिली युपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांचा देशात ३७६ वा क्रमांक आला. त्या ‘आयआरएस’ म्हणून रूजू झाल्या. परंतु यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्या पुन्हा अभ्यासाला लागल्या. आयआरएस पद सांभाळून अभ्यास केला. अडचणी, संघर्ष यावर त्यांनी मात केली. त्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा दिली. यामध्ये त्यांचा देशात १२५ वा क्रमांक आला. २०१५ साली त्या ‘आयपीएस’ म्हणून त्या रूजू झाल्या.
प्रशिक्षण कालावधी सुरू असताना त्यांनी सहा महिने कोल्हापूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कर्तव्य बजावले. ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ हे डोळ्यासमोर ठेवून त्या कामाला लागल्या. महिला अधिकारी असल्यसाने महिलांच्या समस्या त्यांना अधिक माहिती होती. कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले ‘सोर्स’ वापरून त्यांनी एक-दोन नव्हे तर ११ कुंटणखान्यांवर छापे टाकले. यामध्ये अल्पवयीन मुली तसेच महिलांची सुटका केली. अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी एवढ्या मोठ्या कारवाया केल्याने त्यांचा एक ‘वचक’ कोल्हापूरमध्ये निर्माण झाला होता.
प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या २६ डिसेंबर २०१७ रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रूजू झाल्या. रूजू होताच भीमा कोरेगावसारखी दंगल उसळली. नवीन असतानाही त्यांनी आपल्या उपविभागात शांतता ठेवण्यात यश मिळविले. एवढेच नव्हे तर ज्यांनी गोंधळ घातला, अशांना जेरबंद केले.

वाळू माफियांसाठी कर्दनकाळ
माजलगाव तालुक्यातून गोदावरी नदी गेलेली असल्यामुळे या पट्ट्यात वाळू माफियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नियमबाह्य वाळू उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणाºयांवर त्यांनी कडक कारवाई केलेली आहे. एवढेच नव्हे तर दारू विक्रेते, अवैध प्रवासी वाहतूक करणाºयांवरही त्यांनी कारवाया केल्या आहेत. उपविभागात अवैध धंदेवाल्यांसाठी त्या कर्दनकाळ ठरू पहात आहेत.

ज्युनिअर्सला प्रोत्साहन; सिनिअर्सचे सहकार्य
चांगले काम एकट्याने होत नसते. सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते. यापूर्वी काय झाले हे माहिती नाही. परंतु यापुढे कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ज्यांची मानसिकता खचली आहे, अशा ज्युनिअर्सला प्रोत्साहन देत आहे. तर मला चांगले काम करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांचे सहकार्य मिळत आहे, असेही नवटके म्हणाल्या.

मध्यमवर्गीय कुटुंबात झाला जन्म
भाग्यश्री नवटके यांची वडील बाबुराव नवटके हे प्राध्यापक होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. तर आई विमल नवटके या गृहिणी आहेत. दोन बहिणी असून एक शिक्षीका तर दुसरी एमबीए करते. तर भाऊ उद्योजक आहे. घरात कोणी प्रशासकीय अधिकारी नसताना यश मिळविताना अडचणी येतात. परंतु मनात जिद्द असल्यावर हे सहज शक्य होते, हे मला अनुभवातून समजल्याचे नवटके अभिमानाने सांगतात.

व्हायचे होते एरोनॅटिकल इंजिनिअर
इंजिनिअरिंग करून एरोनॅटिकल इंजिनिअर होण्याचे माझे स्वप्न होते. परंतु आपले सिनियर्स युपीएससीचा अभ्यास करत असल्याचे पाहून आपणही हा अभ्यास करू, अशा निश्चय केला. नुसता निश्चयच केला नाही तर उराशी स्वप्न बाळगून ते पूर्ण करून दाखविण्यासाठी परीश्रम घेतले. त्यामुळेच मी आज या पदावर असल्याचे नवटके यांनी बोलताना सांगितले.

- सोमनाथ खताळ - बीड

 

 


पोलिसिंगसह मैदानी- ‘आॅलराऊंडर’
काम करून जाताना छान वाटावं
शासनाच्या योजना राबविताना आकड्यांपेक्षा मी इम्पॅक्टला महत्व देते. एका दिवसात बदल होणार नाही. कर्मचाºयांचेही समूहभावनेतून सहकार्य असते त्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात सेवा करताना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळते. जाताना केलेलं काम पाहताना भारी वाटावं, असा आपला प्रयत्न असल्याची प्रांजळ भावना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक संगीतादेवी पाटील यांनी व्यक्त केली.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यातील पिलीव मूळ गाव, वडील वकील होते तर मामा मंत्री राहिले.जि. प. च्या शाळेत प्राथमिक शिक्षणानंतर रयत संस्थेच्या कर्मवीर विद्यालयात पुढील शिक्षण घेतले. बारावीत असतानाच लग्न झाले. परंतु, लग्नानंतर बी. ए. , एम. ए. इंग्रजीचे शिक्षण पूर्ण केले. स्कॉलरशिप व इतर परीक्षांमुळे सुरुवातीपासून बेस चांगला असल्याने शेजारच्यांनी फॉर्म दाखविला आणि सहजरीत्या भरला, ध्येय ठरविले नव्हते. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. उत्तीर्ण झाले.
१९९८ मध्ये मंत्रालयात असिस्टंट, १९९९ मध्ये भूमीअभिलेख विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. २००२ मध्ये आयोगाच्या परीक्षेत उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. विदर्भ तसेच अहमदनगर जिल्ह्यात कामाची संधी मिळाली. यशदाच्या अतिरिक्त संचालक म्हणून काम पाहिले. मांजरी येथील ग्रामसेवक शिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. राज्य व केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर काम करत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याचे त्या म्हणाल्या.
घरची परिस्थिती चांगली असल्याने समाजजीवनाकडे पाहताना ग्रामीण भागात काम करण्याची उर्मी होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना भेटून ही इच्छा प्रकट केली, संधी मिळाल्याचे सांगून संगीतादेवी पाटील म्हणाल्या, बीड जिल्ह्यात तीन वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत आहे. आमच्या विभागातील योजना आर्थिक व सामाजिक सुधारणेसाठीच्या आहेत. आयुष्यभरासाठी माणसं उभी करण्याच्या या योजना आहेत.
ग्रामीण भागात आपुलकीने संवाद साधत काम करताना सोबतच्या यंत्रणेचीही मदत लागते. आपण ‘की’ पोस्टवर काम करत असलोतरी टीमवर्क महत्वाचे असते. दिवसेंदिवस कार्यपद्धतीत होणाºया बदलासाठी नॉलेज, स्कील, अ‍ॅटीट्यूड महत्वाचे आहे. सकारात्मक दृष्टीने हे गुण कर्मचाºयांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला.
कारवाईपेक्षा कार्यवाहीला प्राधान्य देत कुटुंबभावनेतून व क्षमतेने आमची टीम काम करत आहे. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेच्या तेरा योजना यशस्वीपणे राबविताना एकटी महिला अधिकारी नव्हे तर कर्मचाºयांना याचे श्रेय असल्याचे पाटील म्हणाल्या.
- अनिल भंडारी - बीड

 

 


अल्पशिक्षित आईच्या प्रेरणेने मिळविले यश
आई दुर्गाबाई पवार या अल्पशिक्षित होत्या. परंतु आपण तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. भावंडांनी सोबत अभ्यास केला. त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकले. प्रामाणिकपणा हाच मुख्य दुवा असून पाठीशी आई आणि सासू यांची संस्कारिक शिदोरी असल्यामुळे अडचणींवर मात करण्यासाठी बळ मिळत आहे, असे माजलगावच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार-कर्डीले यांनी सांगितले.
आईचे शिक्षण हे केवळ सातवीपर्यंत तर वडिलांनी पदवी मिळविली. असे असले तरी काही अडचणींमुळे शेती हाच पर्याय त्यांनी निवडला. माझ्या मुलांनी चांगले शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे रहावे, अशी इच्छा आईची होती, परंतु सिरसटवाडीत (ता. इंदापुर जि.पुणे) प्राथमिक शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षणाची सोय नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या वालचंदनगरचा रस्ता धरावा लागला. बारावी पर्यंतचे शिक्षण वालचंदनगरमध्ये घेऊन नंतर पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी पुणे गाठावे लागले.
आपल्या शिक्षणासाठी आई-वडील घेत असलेले कष्ट पाहता आपण कुठेतरी शिक्षण पुर्ण करु न कमवते व्हावे, अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनी होती. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे लॉ साठी प्रवेश घेत एस.आय.ए.सी. या संस्थेमध्ये युपीएससीचे वर्ग करण्यास सुरूवात केली. पहिल्या प्रयत्नात युपीएससीमध्ये अपयश आले. परंतु त्या अपयशाने खचुन न जाता सन २०१३ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. त्यात मात्र त्यांनी यश मिळविले. त्यांना पहिली पोस्टींग सहायक विक्रीकर अधिकारी म्हणुन मिळाली. नोकरी करीत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा एम.पी.एस.सी. मधुन उपजिल्हाधिकारी पदासाठी परीक्षा दिली. त्यात देखील यश मिळाल्यानंतर त्या माजलगावात उपविभागीय अधिकारी म्हणून रूजू झाल्या.

प्रियंका पवार यांच्या कुटुंबामध्ये वडील बंधू विनोद हे सहाय्यक आयुक्त पदावर असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन प्रत्येकवेळी मिळत राहिले. दोन्ही बहिणींपैकी एक योगीनी ही डॉक्टर तर दुसरी मोहिणी ही विक्रीकर अधिकारी झाली. घरची परिस्थिती चांगली असली तरी अभ्यास व मेहनतीशिवाय कोणतेही यश मिळत नाही. त्यामुळे एम.पी.एस.सी. करीत असताना दररोज दहा ते बारा तास अभ्यास करीत होते, असेही पवार म्हणाल्या. त्यांचे वडील लालासो पवार हे मागील तीन वर्षांपासून निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.
सन २०१५ मध्ये जिल्हानिबंधक पदावर असलेल्या राहुल काशिनाथ कर्डीले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. राहुल कर्डीले हे सध्या परभणी येथे सहा. जिल्हाधिकारी म्हणुन काम पाहतात.
यामध्ये त्यांच्या सासू छबूबाई यांची मोलाची साथ त्यांना मिळत आहे. कोणतेही काम करताना कुटुंबीयांचे पाठबळ मिळाल्यास ते काम यशस्वीच होते, यावर माझा विश्वास आहे. कारण मला सासर आणि माहेर असे दोन्हीकडुन पाठबळ मिळत असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याची पावती मला वारंवार समाजाकडुन मिळत आलेली आहे, असेही पवार म्हणाल्या.

- पुरुषोत्तम करवा - माजलगाव

Web Title: Stubborn journey of stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.