औरंगाबाद शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:06 AM2018-05-03T01:06:29+5:302018-05-03T01:07:15+5:30

शहराचा पारा ४२ अंशांवर पोहोचला असतानाच महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे.

Artificial water shortage in Aurangabad city | औरंगाबाद शहरात कृत्रिम पाणीटंचाई

औरंगाबाद शहरात कृत्रिम पाणीटंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचे हाल : आठवड्यातून एक दिवस पाणी; नियोजन कोलमडले; असमान पाणीवाटप; नगरसेवकांचे मौन; आता आंदोलन का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराचा पारा ४२ अंशांवर पोहोचला असतानाच महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यातील नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असताना पाण्याची मागणी वाढली एवढे साधे आणि सोपे कारण देऊन महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एकदाच पाणी देण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे.
महाराष्टÑ दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणीही दुसऱ्याच दिवशीपासून सुरू करण्यात आली. पाण्याअभावी शहरातील काही वॉर्डांना अक्षरश: यातना सहन कराव्या लागत आहेत. एरव्ही छोट्या मोठ्या प्रकरणात बाह्या सरसावून पुढे येणारे नगरसेवकही चुप्पी साधून आहेत, हे विशेष. पदाधिकाºयांनी या निर्णयावर ‘ब्र’अक्षरही काढले नाही. म्हणजेच प्रशासनाच्या या मस्तवाल कारभाराला सत्ताधाºयांचा अप्रत्यक्ष पाठिंबाच आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांसाठी पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर आम्ही खूप पोटतिडकीने बोलतोय, असे चित्र महापालिकेच्या स्थायी समिती सर्वसाधारण सभेच्या सभागृहात नगरसेवकांकडून निर्माण करण्यात येते. शेवटी महापौर प्रशासनाला तीन दिवसांत पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी अन्यथा दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देतात. वर्तमानपत्रांमध्येही मोठमोठ्या बातम्या प्रसिद्ध होतात. तीन दिवसांनंतर परिस्थिती जशीच्या तशी असते. पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा होत नाही. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाला प्रशासन कशा पद्धतीने केराची टोपली दाखवते याचे हे उत्तम उदाहरण होय.
पाण्याची मागणी वाढली
हर्सूल तलावातून महापालिकेला २ एमएलडी पाणी मिळत होते. आता तेसुद्धा बंद झाल्याने जायकवाडीच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवावी लागत आहे. त्यातच पाण्याची मागणीही दुप्पटीने वाढली आहे.
नियोजनाचा अभाव
शहरातील काही वॉर्डांना आठवड्यातून दोनदा पाणी; त्यातही चार ते पाच तास पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिक पाणी भरणे झाल्यावर चक्क पाणी फेकून देतात. काही वॉर्डांमध्ये रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत असतात. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. पाणीपुरवठा करणारे लाईनमनच परस्पर ठरवितात.
दररोज १४० एमएलडी पाणी
जायकवाडीहून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. त्यातील १४० एमएलडी पाणी शहरात येते. या पाण्याचे कोणतेच नियोजन मनपाकडे नाही. आठवड्यात मनपाकडे ९८० एमएलडी पाणी जमा होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतरही महापालिका समाधानकारक पाणी नागरिकांना देऊ शकत नाही.
कंपनीसाठी नागरिकांना चटके
महापालिकेतील काही अधिकारी, सत्ताधाºयांना समांतर जलवाहिनीचे काम करणाºया कंपनीला परत आणायचे आहे. यासाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. कंपनीसाठी सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी चटके का देण्यात येत आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
वितरणात सुधारणा करणार
१ मेपासून महापालिकेने ज्या वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांचा पाणीपुरवठा सहाव्या दिवशी केला. ज्यांना सहा दिवसांआड पाणी होते त्यांना आता थेट सातव्या दिवशी पाणी मिळणार आहे. शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत, नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, पाण्याची मागणी दुप्पट वाढली आहे. पाणीपुरवठ्याच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी सर्व पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. मनपाच्या या निर्णयानंतरही पाणीपुरवठ्यात किंचितही दोन दिवसांमध्ये सुधारणा झालेली नाही.
पाचव्या, सहाव्या दिवशी पाणी
मुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठलनगर, अल्तमश कॉलनी, किराडपुरा, कटकटगेट, बारी कॉलनी, बायजीपुरा, लोटाकारंजा, भडकलगेट, सुरेवाडी, गणेश कॉलनी, शहाबाजार, जिन्सी, खाराकुंआ, गुलमंडी, न्यायनगर, पुंडलिकनगर, उत्तमनगर, जवाहर कॉलनी, विष्णूनगर, उल्कानगरी, एन-११ गजाननगर, आरेफ कॉलनी, टाऊन हॉल, बुढीलेन, औरंगपुरा, भीमनगर भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, खडकेश्वर, नागेश्वरवाडी, समर्थनगर.

Web Title: Artificial water shortage in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.