राठीनगरात चोरांची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:29 PM2017-10-30T23:29:46+5:302017-10-30T23:30:04+5:30
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात,....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. संत्रस्त नागरिकांनी यासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडे निवेदन दिले आहे.
राठीनगरातील ४ घरफोड्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्य स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. या घरफोडीमधील आरोपींचा त्वरेने तपास करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, या भागात रात्रकालीन गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. शहरात चोरीच्या केवळ अफवा आहेत, असा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जातो. मात्र राठीनगरात प्रत्यक्षात जे घडले ती अफवा नाही. त्यामुळे शहरात चोर शिरले नसल्याचा दावा पोलीस का करताहेत, असा प्रश्न राठीनगर वासियांनी उपस्थित केला आहे.
शनिवारी पहाटे येथील ललित जावरकर, सुधीर बारबुद्धे, पोतदार व बोंडे यांच्या घरात शिरुन चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. मात्र या घरफोडीचा उलगडा होऊ शकला नाही. किरण महल्ले, अर्चना बररबुध्दे, सोनाली जावरकर, छाया कोलते, स्मिता कुकडे आदींनी भीतीयुक्त वातावरण निवळण्याची विनंती केली.