अकोला जिल्हय़ात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:19 AM2018-02-12T02:19:23+5:302018-02-12T02:21:30+5:30

अकोला : जिल्हय़ात रविवारी सकाळी गारपिटसह अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे हरभरा आणि तूर सोंगणी करुन ठेवलेल्या शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. नुकसानीचे सर्वेक्षण १२ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

Akola district unseasonal rainy season; The farmer is inefficient | अकोला जिल्हय़ात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी हतबल

अकोला जिल्हय़ात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी हतबल

googlenewsNext
ठळक मुद्देमहान, हातोला, पुनोती खुर्द, रसूलपूर येथे कोसळली वीज तेल्हारा तालुक्यातील वारी येथे सहा घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात रविवारी सकाळी गारपिटसह अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे हरभरा आणि तूर सोंगणी करुन ठेवलेल्या शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. नुकसानीचे सर्वेक्षण १२ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.
तेल्हारा : तालुक्यात अचानक झालेली गारपीट व पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, हाती आलेले पीक गेल्याने शेतकरी पार खचून गेला आहे. तालुक्यात सर्वाधिक गारपिटीचा फटका बागायत क्षेत्र असलेल्या दानापूर परिसराला बसला. तालुक्यात अचानक आलेल्या गारपिटीमुळे तालुक्यात १८५0 हेक्टरवर सर्व पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अविनाश मेश्राम यांनी दिली.
 यावर्षी खरीप हंगामात सोयाबी मूग उडीद, कापूस पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. त्यात सरकारने बोंडअळीची मदत अजूनही दिली नाही. 
या गारपिटीने दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी बु., हिंगणी खु., तळेगाव बाजार, चितलवाडी, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंढा शेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, हिरवखेडसह अनेक गावांत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील सोंगलेला हरभरा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ झाली.
वाडी अदमपूर -वाडी अदमपूर परिसरात सकाळी ८ वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसासह तुरळक स्वरूपाची गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या पसिरातील अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकाला बसला आहे. या परिसरातील शेतकर्‍यांनी रब्बी पीक म्हणून हरभरा या पिकाचा मोठय़ा प्रमाणात पेरा केला आहे.  

आमदार सावरकरांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी 
चोहोट्टा बाजार : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा बळीराजाला नेहमी बसतो. रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत असतानाच अवकाळी पाऊस व गारपीटचा तडाखा पिकांना बसल्याने शेकतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपीट झाल्याची माहिती अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना मिळताच त्यांनी तत्काळ गारपीट झालेल्या भागाकडे धाव घेतली. वरुळ जऊळका, विटाळी, सावरगाव, खापरवाडीसह इतरही गावांमध्ये आमदार सावरकर यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, कृषी अधिकारी ठाकरे व संबंधित तलाठय़ांना तत्काळ सर्व्हे करण्याचा आदेश दिला. तसेच गारपीट झालेल्या सर्वच गावांची माहिती घेऊन सर्व्हे करण्याच्या सूचनाही आमदार सावरकर यांनी दिल्या. याप्रसंगी राजेश नागमते, राजेश रावणकर, संदीप उगले, दत्ता गावंडे, विठ्ठल वाकोडे, चेतन डोईफोडे, काशिनाथ हिंगणकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गारपीट झाल्याची माहिती मिळताच शेतकर्‍यांच्या समस्येची दखल घेत आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.  
चार ठिकाणी कोसळली वीज 
अकोला : जिल्ह्यात बाश्रीटाकळी तालुक्यात तीन ठिकाणी तर मूर्तिजापूर तालुक्यात एका ठिकाणी वीज कोळसली. बाश्रीटाकळी तालुक्यात महान आणि हातोला येथे झाडावर वीज कोसळली.  

तेल्हारा : गारपीट नुकसानाचे आजपासून पंचनामे 
तालुक्यात अचानक आलेल्या गारपीट, वादळीवारा, पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये १९३४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी दिला. या नुकसानाचे पंचनामे व सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. तालुक्यातील दानापूर, वारी, सौंदळा, माळेगाव, बेलखेड खंडाळा, मनात्री, दहीगाव, पंचगव्हाण, वांगरगाव सह तालुक्यातील बहुतांश गावात कमी-जास्त प्रमाणात गारपीट झाली. अचानक आलेल्या वादळीवारा, पावसाने हरभरा, गहू, कांदा, केळी, संत्रा पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १९३४ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदारांनी दिला. यामध्ये वारी येथील सहा घरांची पडझड झाली. त्यामध्ये जीवित हानी नसली, तरी नुकसान मात्र झाले. तालुक्यातील झालेल्या शेत नुकसानाचे पंचनामे सोमवार, १२ फेब्रुवारीपासून करणार असल्याचे तहसीलदार येवलीकर यांनी सांगितले.  


बाश्रीटाकळी तालुक्याला गारपीटचा तडाखा
बाश्रीटाकळी:  तालुक्यात कान्हेरी सरप, सायखेड, चोहोगाव, धाबा,  सोनगिरी, सिंदखेड आदींसह इतर ठिकाणी जोरदार गारपीट झाली. वादळी पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली. तालुक्यातील पुनोती खुर्द येथे झाडावर वीज कोसळली. १0 फेब्रुवारी रोजी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने शेतकर्‍यांनी हरभरा व गहू वाळण्यापूर्वीच थ्रेशर यंत्राने काढणे सुरू केले. काही ठिकाणी सकाळी ९.३0 वाजतापासून वादळी पाऊस सुरू झाला. अध्र्या तासाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा दुपारी काही वेळ पाऊस सुरू होता. धाबा व चोहोगाव शिवारात तुरळक गारपीट झाली. यामुळे अधिक प्रमाणात असलेल्या या शिवारातील डाळिंब, निंबू, संत्रा फळबागांचा फुलोरा अवस्थेला व बहाराला बाधा पोहोचली. मागील वर्षीच्या दुष्काळी स्थितीतून सावरण्यासाठी तालुक्यात सिंचन सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांनी रब्बी पिके घेतली; परंतु ऐन काढणीच्या वेळी वादळी पाऊस व गारपीट येण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची दुष्काळी व नैसर्गिक आपत्तीबाबत चिंता वाढली आहे. कान्हेरी सरप येथे जोरदार गारपीट झाली. 

खेट्री परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट
खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा, राहेर, अडगाव, वहाळा, सावरगाव, चान्नी, उमरा, सुकळी, चतारी व सायवणी या गावांत अचानक वादळी वार्‍यासह गारपीट झाली.
गेल्या आठवडाभरापासून खेट्री भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी वादळी वार्‍यासह गारपीट पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या विविध पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये हरभरा, कांदा, गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. अगोदरच गेल्या चार वर्षांपासून सतत नापिकीमुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी झाला आहे. नापिकीमुळे शेतकर्‍यांवर कर्ज थकीत झाल्यामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. मागील कर्जाची परतफेड होईल, या आशेवर शेतकर्‍यांनी यावर्षीसुद्धा बँक, सावकाराकडून व्याजाने पैसे काढून रब्बी पिकांची पेरणी केली; परंतु शेतकर्‍यांच्या आशेवर अस्मानी संकटामुळे पाणी फिरले आहे. यावर्षीसुद्धा शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

Web Title: Akola district unseasonal rainy season; The farmer is inefficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.