वेळ आलीच तर.. नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईवर धडक मारू -विवेक कोल्हे

By सचिन धर्मापुरीकर | Published: November 3, 2023 06:31 PM2023-11-03T18:31:45+5:302023-11-03T18:31:53+5:30

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध : कोपरगावात लाक्षणिक उपोषण

We will take the farmers of Nagar, Nashik and attack Mumbai - Vivek Kolhe | वेळ आलीच तर.. नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईवर धडक मारू -विवेक कोल्हे

वेळ आलीच तर.. नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईवर धडक मारू -विवेक कोल्हे

कोपरगाव (जि. अहमदनगर) : सरकारमध्ये असतानाच आमचे बहुतांश आंदोलन झाली आहे. हक्काच्या व्यक्तीकडेच हट्ट धरला जातो. सरकार जरी आमच्या विचाराचे असले तरी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी नाही. त्यामुळे राजकिय, प्रशासकिय यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनी दाखवलेले नैराश्य चिंताजनक आहे. त्यामुळे 'ज्याचे शेतकऱ्यांवर लक्ष तोच आपला पक्ष, हेच आपले धोरण'. सणासूदीच्या दिवसांत आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तिव्र करावे लागेल. नगर, नाशिक येथील शेतकऱ्यांना संघटीत करून वेळ पडल्यास मुंबईवर धडक मारण्याची आमची तयारी असल्याचा इशारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिला.

जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातुन पाणी सोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून शुक्रवारी कोपरगाव येथील तहसिल कार्यालयासमोर विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी निवेदन स्विकारले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या, 'कसे लढायचे, आणि कसे भिडायचे' हे आम्हाला स्व. शंकरराव कोल्हे यांनी शिकवले आहे. पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे राजकिय पक्ष, संघटनांनी एकत्र येवून लढा उभारण्याची गरज आहे. गोदावरी खोरे तुटीचे असतानाही येथून पाणी सोडणे म्हणजे, 'एकाला तारण्यासाठी, दुसऱ्याला मारण्या सारखे आहे'. आमचे हक्काचे पाणी घेण्याऐवजी जायकवाडीच्या २६ टीएमसी मृतसाठ्यातील ५ टीएमसी पाणी वापरण्याची परवाणगी दिली, तर नगर, नाशिकचे पाणी सोडण्याची गरज पडणार नाही.

यावेळी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, बाळासाहेब वक्ते, दिलीप बनकर, दत्ता काले, दिपक चौधरी, संजय सातभाई, शरदराव थोरात, साहेबराव रोहोम, केशवराव भवर, राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुणकर, प्रदिप नवले, विजय रोहोम, शिवाजीराव वक्ते, रविंद्र पाठक, सुनील देवकर, श्री आढाव, संदीप देवकर, अनिल गायकवाड, विनय भगत, विवेक सोनवणे, विनोद चोपडा, कैलास जाधव, बबलू वाणी, वैशाली साळूंके, वैशाला आढाव यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या
मेंढेगिरी समिती कालबाह्य झालेली आहे, त्यासाठी जो अभ्यासगट नेमण्यात आलेला आहे, त्याचा अहवाल आल्याशिवाय उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यांत येवु नये. गोदावरी कालवे लाभक्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती, पिण्याचे पाणी, पशुधन यासाठी जी आर्वतने द्यावी लागणार आहे, त्यात पाण्यांचे प्रचंड लॉसेस होणार असल्याने पाण्याची तुट निर्माण होणार आहे. त्यामुळे मुळातच तुट असलेल्या क्षेत्रातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येवु नये.

नगर नाशिक, विरुध्द मराठवाडा असा प्रादेशिक पाण्यांचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यांसाठी अप्पर वैतरणातुन समुद्रास वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी सेंडल गेट द्वारे त्वरीत मुकणे धरणांत वळवून अप्पर वैतरणा धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढवावी. सहयाद्री पर्वत माथ्यावरील पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे ३० वळण बंधाऱ्याद्वारे तातडीने गोदावरी खोऱ्ंयात वळविण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. पश्चिम वाहिन्या, नार पार, दमणगंगा, पिंजाळ, वैतरणा, उल्हास खोऱ्यातील समुद्राला वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी युध्द पातळीवर नियोजन करावे.

गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना
लाक्षणिक उपोषणात हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या ध्वजाचे अनावरण माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी 'मराठवाडा तुपाशी, नगर-नाशिक उपाशी', ' कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही', मेंढेगिरी समितीचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दाणाणून गेला होता.

Web Title: We will take the farmers of Nagar, Nashik and attack Mumbai - Vivek Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.