दोन दिवसात भाजपाला जिल्हाध्यक्ष
By admin | Published: July 18, 2014 01:12 AM2014-07-18T01:12:26+5:302014-07-18T01:39:15+5:30
अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले तरी भाजपाचे जिल्हाध्यक्षपद अजूनही वाऱ्यावरच आहे.
अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले तरी भाजपाचे जिल्हाध्यक्षपद अजूनही वाऱ्यावरच आहे. त्यामुळे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत. आतापर्यंत निवड व्हायला हवी होती, असाच सूर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान दोन-तीन दिवसात जिल्हाध्यक्षाच्या नावाची प्रदेशकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.
केंद्रात भाजपाचे सरकार आल्याने जिल्ह्यातील भाजपाच्याही आशा उंचावल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आठ जागांवर दावा केला आहे. पूर्वीपेक्षा श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी या तीन अतिरिक्त जागांवर भाजपाने दावा सांगितला आहे. याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी बोलून पुढील निर्णय होणार आहे. भाजपाच्या जागा वाढणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. यामुळेच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचरला आहे. काही कार्यकर्त्यांनी तर स्वबळावर लढण्याची भाषा केली, मात्र त्याला प्रदेशाध्यक्षांनीच आवर घातला होता. त्यामुळे अन्य ठिकाणच्या इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या आहेत. भाजपाला जिल्हाध्यक्ष हवा आहे, तो लवकर मिळावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाध्यक्षपदाची आठ दिवसात निवड केली जाईल, असे सांगितले होते. आता या बैठकीला पाच दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसात जिल्हाध्यक्षपदाच्या नावाची मुंबईवरूनच घोषणा होईल, असे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत.
कदम यांना संधी?
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याच गळ््यात पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या नावावर भाजपाच्या नेत्यांनीही शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाच बाकी असल्याचे भाजपाचे पदाधिकारी सांगत आहेत.
अभय आगरकर यांचेही जिल्हाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते. मात्र भाजपाने महापालिका क्षेत्रातील शहराच्या अध्यक्षाला जिल्हाध्यक्षपदाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आगरकर हे तसे जिल्हाध्यक्षच आहेत. याच कारणामुळे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) या पदासाठीचे आगरकर यांचे नाव मागे पडले आहे. त्यामुळे कदम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.