मुख्यमंत्रीसाहेब, ३०० कोटींचे काय झाले? : माजी सभापतींचे स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:23 AM2019-08-24T11:23:41+5:302019-08-24T11:25:23+5:30

महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही.

Chief Minister, what happened to 2 crore? : Reminder of former Speaker | मुख्यमंत्रीसाहेब, ३०० कोटींचे काय झाले? : माजी सभापतींचे स्मरणपत्र

मुख्यमंत्रीसाहेब, ३०० कोटींचे काय झाले? : माजी सभापतींचे स्मरणपत्र

Next

अहमदनगर : महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. या निधीची मागणी करत भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पक्षाला निवडणुकीत केलेल्या घोषणेची आठवण करून दिली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाने सत्ता स्थापन केली आहे़ महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचा महापौर झाल्यास शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती़ तसेच महापालिका निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांचीही सभा शहरातील गांधी मैदान येथे झाली होती. त्यांंनीही शहरासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली होती़ मात्र गेल्या आठ महिन्यांच्या काळात एक रुपयाचाही निधी पालिकेला मिळाला नाही़ महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गांधी मैदानात होत आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेतील भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पत्र पाठविले आहे़
यापूर्वी त्यांनी १५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र दिले होते़ मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही़ त्यामुळे शिंदे यांनी आता थेट पंतप्रधानानांच पत्र लिहिले आहे़ महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली होती़ त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेतून निधीची घोषणा करावी, अन्यथा पक्षावर नगरकर विश्वास ठेवणार नाहीत, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिलेला शब्द पाळला नाही़ त्यामुळे शहरासह नगरसेवकांवर टीका होऊ लागली असून, पक्षाच्या विश्वासार्हतेवर भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापतींनी शंका उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Chief Minister, what happened to 2 crore? : Reminder of former Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.