लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत यवतमाळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पुरविले जाणारे पाणी शुद्ध असते, असा या विभागाचा दावा आहे. खरेच शुद्ध पाणी घरातील नळापर्यंत येते काय, हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात. परंतु, अनेक ठिकाणी असलेले लिकेज, कर्मचाऱ्यांकडून कामे करताना होत असलेली दिरंगाई या व इतर कारणांमुळे काही भागात शुद्ध पाणी पोहोचण्याविषयी साशंकताच आहे. अगदी गटारांमधून पाईपलाईन गेलेल्या आहेत. काही ठिकाणी वाॅल्व्हमधून गटाराचे पाणी झिरपते आहे. तर काही ठिकाणी सम्पवरच आंघोळ करण्याचे प्रकार घडत आहेत. गाळयुक्त पाण्याची तर यवतमाळकरांना सवय झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असल्याचे सांगितले जाते.
प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुनेनागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
अशी हाेते तपासणीयवतमाळ शहराला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण चापडोह आणि निळोणा फिल्टर प्लांटवरून होते. याठिकाणी दररोज पाच नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात.घेतलेले नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडे पाठविले जाते. तेथे इकोली बॅक्टेरिया आदी चाचण्या होतात. क्लोरिन तपासले जाते.
पिण्याच्या पाण्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. जेणेकरून नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचेल. पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी झाल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. शुद्ध पाणी मिळावे यासाठी खबरदारी घेण्यात येते.- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा