राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 08:29 PM2018-06-18T20:29:47+5:302018-06-18T20:30:13+5:30

राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते.

The tree plantation campaign of the state became movement | राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ

राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वृक्षलागवड, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आढावायवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते. तसेच २०१८-१९ मध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे तीन लक्ष कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा ५० हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. या दोन्ही महत्वकांक्षी योजना आपापल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने ‘वन से धन तक’ ही संकल्पना राबवावी, अशा सूचना अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात १३ कोटी वृक्षलागवड मोहीम व प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा व्हीसीद्वारे आढावा घेताना ते बोलत होते. वृक्ष लागवड मोहिमेत पारदर्शकता आवश्यक आहे, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, टीकाकारांना संधी देऊ नका. पारदर्शकपणे सर्व गोष्टी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’
१ ते ३१ जुलैपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. त्यानंतर वृक्षांच्या संवर्धनावर भर द्या. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान यवतमाळमध्ये साकारण्यात येणारे ‘आॅक्सीजन पार्क’ ही संकल्पना नाविण्यपूर्ण व चांगली आहे. तसेच जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ‘एक गॅस-एक वृक्ष’ ही संकल्पना राबवावी. जिल्ह्याचा आराखडा तयार करताना वृक्षलागवडीसाठी शहराचासुद्धा आराखडा पालिकेने तयार करावा. जलयुक्त शिवारला वनयुक्त शिवारमध्ये बदलवा. स्मशानभूमीत तसेच शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वनऔषधी लावण्याचे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा आढावा घेताना त्यांनी मुद्रा बँक जिल्हा नियोजन समन्वय समितीत अशासकीय सदस्यांनी त्वरित नेमणूक करण्याचे आदेश दिले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आयईसी प्लान तयार करून बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीला सीईओ जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भानुदास पिंगळे, अरविंद मुढे, अभर्णा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.

५९ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
यवतमाळ जिल्ह्याला ५९ लाख १७ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत ५५ लाख ८८ हजार खड्डे पूर्ण करण्यात आले. राज्यात चौथ्या क्रमांकाचे हे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी वनमंत्र्यांना दिली.

Web Title: The tree plantation campaign of the state became movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.