उमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील नागरिकांना शुद्ध आणि मुबकल पाणी मिळावे यासाठी ११ कोटींची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेचे तीन-तेरा वाजले असून १४ गावातील नळ योजना कायमस्वरूपी बंद आहे. तर ७० लाख रुपयांच्या नळ योजनेचे काम अपूर्ण आहे. ७१ गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दीड लाख नागरिकांना आजही आपली तहान हातपंपावर भागवावी लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची नळ योजना राबविण्यात आली. परंतु पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अकोली, अंबाळी, बाळदी, बेलखेड, भवानी, बिटरगाव, भोजनगर, बोरगाव, बोरी, चातारी, बोथा, बिटरगाव बु., ब्राम्हणगाव, चिखली, चिंचोली तांडा यासह अनेक गावात नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र पंचायत समितीने देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना कुचकामी ठरली आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी कोट्यवधी रुपयांच्या नळ योजनेचा बोजवारा उडाला आहे.बेलखेड, चिल्ली, देवसरी, पार्डी, पोफाळी, सावळेश्वर, बिटरगाव, भवानी, मुरली, पळशी, बाळदी, भोखरखेडा, सोनदाबी, हातला या गावातील सुमारे तीन कोटी रुपयांची नळ योजना बंद आहे. त्याच प्रमाणे ढाणकी येथील योजनाही बंद पडली आहे. कारखेडा येथील ४० लाखांची योजना, भांबरखेडा येथील आठ लाख, गोविंदपूर आठ लाख, मरसूळ आठ लाख, मुरली आठ लाख अशा ७२ लाखांच्या योजना अर्धवट स्थितीत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक गावात हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने उमरखेड तालुक्यात नळ योजनेची कामे रखडल्याचा आरोप गावकरी करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण नळयोजनेचे तीनतेरा
By admin | Updated: January 11, 2015 22:57 IST