लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-तुळजापूर मार्गावरील आर्णीनजीक भरधाव दुचाकी कारवर आदळल्याने दुचाकीस्वार तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. संदीप सीताराम आत्राम (३०), दीपक कचरू मसराम (२९) दोघेही रा. कुऱ्हा ता. आर्णी आणि नत्थू कुमरे (४८) रा. यवतमाळ, अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीने (एम.एच.२९/बी.ए.१०४७) आर्णीकडून यवतमाळकडे जात होते. त्याचवेळी समोरून एक कार (एम.एच.२५/आर.५७३०) यवतमाळ येथून उस्मानाबादकडे जात होती. आर्णीनजीक उड्डाणपुलावर दुचाकी चुकीच्या दिशेने भरधावपणे जात होती. दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कारवर आदळली. यात तिघेही जागीच ठार झाले. उड्डाणपुलानजीकच्या वीज वितरण कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात घडला. अपघात भीषण होता. माहिती मिळताच ठाणेदार पितांबर जाधव यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र, डाॅक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर तिघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.