नेर : तालुक्यातील लोणी व पेंढारा या गावांमध्ये शेतातील काडीकचरा जाळणे महाग पडले. यामध्ये इंजीन, शेणखताचे ढिगारे व २७० झाडे जळून खाक झाली. तालुक्यात दोन विविध घटनांमध्ये शेतात लावलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी घडली. तालुक्यातील पेंढारा येथील गोविंदराव बेले यांनी याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रामकृष्ण कांबळे याने शेतातील केरकचरा पेटविला. कचरा पेटत गेल्याने बेले यांच्या शेतासह इतर सहा शेतकऱ्यांच्या शेतातील शेणखताचे ढिगारे या आगीत जळाले. तसेच इंजीन जळून ५० हजारांचे नुकसान झाले. दुसऱ्या एका अशाच प्रकारच्या घटनेत लोणी शिवारात अशाच प्रकारे कचरा पेटविण्यासाठी आग लावली असता रोहयो योजनेतून रस्त्याच्या बाजुलाला लवलेली २७० झाडे जळून खाक झाली. याप्रकरणी लोणीचे ग्रामसेवक विशाल कुटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उन्हाळ््याच्या दिवसांमध्ये आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातच सध्या शेतांमध्ये उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. यामध्ये कचरा गोळा करून तो जाळल्या जातो. बऱ्याचदा हवेमुळे ही आग इतरत्र पसरते. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. ती न घेतल्या गेल्यामुळे नेर तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतांमध्ये आगीच्या या घटना घडल्या. (तालुका प्रतिनिधी)
शेतातील हजारोंचे साहित्य जळून खाक
By admin | Updated: May 31, 2015 02:18 IST