३० जून : धडकमध्ये वर्ग करण्याची मागणीबोटोणी : जलपूर्ती सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे विहिरींच्या बांधकामासाठी यंत्रणा धावपळ करीत आहे. मात्र मग्रारोहयोच्या विहिरींकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याने त्या विहिरी धकडकमध्ये वर्ग कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.सिंचनाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न व्हावे, या उदात्त हेतूने शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी जलपूर्ती सिंचन विहीर ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी मारेगाव तालुका कृषी कार्यालयाला १५१ विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २५ विहिरी रद्द झाल्या आहेत. सन २०१४ अखेरीस ४३ विहिरी बांधून पूर्ण झाल्या आहे. आता केवळ ८३ विहिरी शिल्लक आहे. धडक सिंचन योजनेंतर्गत एकूण २३ विहिरी असून १० जून २०१५ अखेरस १२ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. सात विहिरींचे बांधकाम सुरू आहे. मग्रारोहयो अंतर्गत एकूण ६० विहिरी असून पाच विहिरींचे काम सुरू आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, धडक अंतर्गत विहिरींचे बांधकाम कंत्राटदारामार्फत करण्यात येत असल्याने या विहिरी पूर्णत्वास येत आहे. मात्र मग्रारोहयो अंतर्गतच्या विहिरी जॉबकार्डधारक मजुरांमार्फत बांधण्यात असल्याने या विहिरींना शेतकऱ्यांनी नापसंती दिली आहे. मजुरांच्या उपलब्धीअभावी मग्रारोहयोच्या विहिरी पूर्ण होऊ शकल्या नाही. या विहिरी धडक योजनेत वर्ग करून द्याव्या, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. या योजनेच्या कामासाठी शासनाने ३० जूनपर्यंत मुदत दिली. उन्हाळ्यातील लग्नसराई, पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी यंत्रणेसह शेतकऱ्यांची आता धावपळ होत आहे. (वार्ताहर)
जलपूर्ती सिंचन विहिरींसाठी धावपळ
By admin | Updated: June 19, 2015 02:09 IST