वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नाही, माहिती मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:33+5:30
वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गासोबतच आपले दैनंदिन कामकाज चालवायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वृत्तपत्राने कोरोनाचा प्रसार होतो ही अफवा आहे. शास्त्रीयदृष्ट्या वृत्तपत्रातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यताच नाही. उलट वृत्तपत्र वाचनामुळे कोरोना महामारीच्या काळात अद्ययावत व अधिकृत माहिती मिळते. वृत्तपत्रापासून कुठलाही धोका संभवत नाही, असे येथील जनरल फिजिशियन डॉ.दीपक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गासोबतच आपले दैनंदिन कामकाज चालवायचे आहे. अशा स्थितीत रोजच्या व्यवहारात वावरताना घ्यावयाची दक्षता आणि स्वत:बद्दल घ्यावयाची काळजी अशा दोन आचारसंहितांचे पालन करावे लागणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी तीन लेअर असलेला कापडी मास्क वापरावा, मास्कला वारंवार हात लावू नये, शेला, दुपट्टा याचा वापर करणे धोकादायक आहे. परस्परांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे, शक्यतोवर गर्दी होईल अशा ठिकाणी जावू नये, सार्वजनिक कार्यक्रमात जावू नये ही खबरदारी रोजच्या व्यवहारात घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका बऱ्याचअंशी कमी करता येऊ शकतो. कामकाजाच्या ठिकाणी सोडियम हायड्रोक्लोराईड फवारावे, खुर्च्या, दाराचे हॅन्डल व ज्या ठिकाणी वारंवार स्पर्श होऊ शकतो, तेथे सोडियम हायड्रोक्लोराईड फवारणी करावी.
ज्यांना उच्चरक्तदाब (बीपी), हृदयरोग, मधुमेह (डायबिटीज) हे आजार आहेत त्यांना कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. त्यांनी पूर्णपणे सुरक्षित राहण्याची गरज आहे. वैयक्तिक आचारसंहितेत योग्य झोप (किमान आठ तास), व्यायाम, योग्य आहार ज्यामध्ये प्रथिने, उकळलेले धान्य, डाळी, दूध, अंडी, मासे, व्हीटॅमिन सी असलेले आंबट फळ, झिंगे हा आहार घ्यावा. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बाहेरचे जेवणे घेणे व इतर खाद्य पदार्थ टाळावे, बरेच जण गरम पाण्याचा वापर करतात मात्र याचा फारसा फायदा होईल असे वाटत नाही.
कोरोनाची लक्षणे साधारणत: सर्दी, ताप, खोकला हीच आहे. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालविता कोरोना टेस्ट करून घ्यावी. रोगाला घाबरुन घरीच औषध घेत बसू नये. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. योग्य उपचार घेतल्यास कोरोना पूर्ण बरा होऊ शकतो. सध्या तरी शासनाने खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास परवानगी दिली नाही. ती तपासणी सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयातही उपचार करता येणे शक्य आहे, असे डॉ. दीपक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात आचारसंहिता पाळा
कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी सध्या तरी कुठलेही प्रभावी औषध नाही. त्यामुळे वैयक्तिक आचारसंहिताच कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक आचारसंहितेलाच महत्व दिले पाहिजे, असे येथील जनरल फिजीशियन डॉ.दीपक अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.