आरोप-प्रत्यारोप : नगराध्यक्षांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘सीओं’ची तक्रारवणी : येथील नगरपरिषदेत अद्यापही ‘कलगीतुरा’ सुरूच आहे. आरोप आणि प्रत्यारोप करीत तक्रारी सुरूच आहे. आता खुद्द नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांची तक्रार त्यांना थेट निलंबित करण्याचीच मागणी केली आहे. येथील तत्कालीन नगराध्यक्ष प्रिया लभाने यांच्याविरूद्ध अविश्वास आणून करूणा कांबळे यांना नगराध्यक्षपदी आरूढ करण्यात आले. मात्र नव्या नगराध्यक्षांचा अद्याप वचक निर्माण झालेला दिसत नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यातच बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. नगराध्यक्षांच्या आदेशांचे पालन मुख्याधिकाऱ्यांकडून होत नसल्याने मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आता नगराध्यक्ष कांबळे यांनी जिल्हधिकाऱ्यांकडे केली आहे. वणी नगरपरिषदेमध्ये विकासाला ‘ब्रेक’ लागला आहे. हे नागरिकांसह पदाधिकारी व अधिकारीही मान्य करतात. मात्र याला जबाबदार कोण, हा जनतेचा साधा प्रश्न आहे. नगरपरिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा २१ आॅक्टोबरला झाली होती. तेव्हापासून साडेतीन महिने लोटले तरी अद्याप सर्वसाधारण सभा झाली नाही. त्यामुळेच अखेर मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नगराध्यक्षांना सर्वसाधारण सभा घेण्यासाठी सूचित करावे, अशी विनंती करावी लागली. मात्र नगराध्यक्ष कांबळे म्हणतात, मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन सर्वसाधारण सभेसाठी विषय सुचविण्यासाठी कळविले होते. तथापि त्यांच्याकडूनच विषय न आल्याने सर्वसाधारण सभा घेता आली नाही. नगराध्यक्षांना पत्र देऊनही मुख्याधिकारी सर्वसाधारण सभा घेण्याविषयी कळवू शकले असते. मात्र त्यांनी सरळ जिल्हाधिकाऱ्यांचेच दार ठोठावल्याने दोघातील बेबनाव आता उघड झाला. नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना काही पत्रांद्वारे माहिती मागितली, व काही ठरावांची अंमलबजावणी करण्याचे सूचित केले. मात्र मुख्याधिकाऱ्यांकडून त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. रवी गॅस एजन्सीच्या गोडावूनची परवानगी, एका बिल्डरला दिलेली बांधकाम परवानगी याविषयीची कारवाई करण्यात कुचराई होत असल्याचा नगराध्यक्षांचा आरोप आहे. एका धरम काट्याची चौकशी होणार होती. त्याची कागदपत्रे नगराध्यक्षांनी मागितली. तीसुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी पुरविली नाही. वीज कंत्राटदाराचे काम समाधानकारक असल्याने त्यांचे देयक प्रदान करण्यात येऊ नये, असे सुचवूनही त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. मुख्याधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देऊनही ते मुख्यालयी राहात नाही. उलट मुख्याधिकारी काही विरोधी नगरसेवकांच्या इशाऱ्यानुसार कार्य करतात, असा आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. त्यामुळे येथील मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तनाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी त्यांची मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पालिकेचा कलगीतुरा सुरूच
By admin | Updated: February 10, 2016 03:13 IST