खासगी डॉक्टरांना रुग्ण तपासणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:12+5:30
कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर आपण रुग्ण न तपासण्याबाबतचे कोणतेही लेखी अथवा मौखिक आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी डॉक्टरांनी सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासू नये असा कुठलाही आदेश आपण जारी केलेला नाही. खासगी डॉक्टरांना या आजाराचे रुग्ण तपासणे बंधनकारक आहे. जे डॉक्टर ही जबाबदारी टाळतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी स्पष्ट केले.
कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर आपण रुग्ण न तपासण्याबाबतचे कोणतेही लेखी अथवा मौखिक आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण नेहमीच आयएमएच्या संपर्कात राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘वॉकिंग सॅम्पल्स’ची संकल्पना
जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला त्याच्या घरीच आयसोलेट करता येणार आहे. असे ४४ रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. शिवाय कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीकरिता ‘वॉकिंग सॅम्पल्स’ ही संकल्पना राबविली जात आहे.
मृत्यू दर २.६८ टक्के, बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के
जिल्ह्यात कोरोना मृत्यूचा दर हा २.६८ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. मृतांमध्ये सारीची लक्षणे असलेले व कोरोना पॉझिटिव्ह ४३ जणांचा समावेश आहे. सात जणातच केवळ कोरोनाची लक्षणे होती. यावरून स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते. ५० मृतांमध्येही पाच जण बाहेर जिल्ह्यातील आहे. त्यांना वगळल्यास मृत्यूदर आणखी कमी होतो. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे दहा लाख लोकांमध्ये १४० टेस्ट करा असे निर्देश आहे. प्रत्यक्षात ८०० टेस्ट केल्या जात आहे. तपासणीमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांचा रेट हा ७.७ टक्के असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले.