विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली एसटी महामंडळाची अपघातविरहित सेवा बक्षीस योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व चालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेच्या माध्यमातून चालकांना २० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च, असा या योजनेचा कालावधी राहणार आहे. यासाठी चालकांना २६० दिवस विना अपघात सेवा द्यावी लागणार आहे.
एसटी बसला अपघाताच्या संख्येत २०२० ते २०२४ या पाच वर्षात मोठी वाढ झाली. शिवाय अपघात नुकसान भरपाईची रक्कमही वाढली. तसेच एसटीची प्रतिमा नकारात्मक होऊ लागली. म्हणूनच अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
वर्धापनदिनी गौरवअपघातविरहित सेवा देऊन बक्षिसाकरिता पात्र ठरलेल्या चालकांचा महामंडळाचा वर्धापन दिन (१ जून) किंवा १५ ऑगस्ट रोजी बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे.
बक्षिसाचे असे आहेत टप्पे
- अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांसाठी बक्षिसाचे विविध टप्पे पाडण्यात आले आहेत.
- चालकाने एक वर्षात २६० दिवस (स्टेअरिंग ड्यूटी) अपघातविरहित सेवा दिल्यास १,५०० रुपये बक्षीस मिळणार आहे.
- सन २०२५-२६ची गणना १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ राहणार आहे. पाच वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना ५ हजार रुपये, १० वर्षांकरिता १० हजार, १५ वर्षांकरिता १५ हजार आणि २० वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना २० हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.