पुसद : पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिातची आहे, असा बागुलबुवा कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी शासन व विमा कंपनी मागील पाच वर्षापासून करीत आहे. प्रत्येक वर्षाला शेतकरी पीक विम्याची रक्कम भरतो. दरवर्षी शेतकऱ्यांचे काही ना काही नुकसान होते. पण शेतकऱ्यांना विम्याचा लाभ म्हणून काहीही मिळत नाही. ज्या शेतात सलग तीन वर्ष नुकसान झाले आहेत किंवा त्या परिसराची आणेवारी सतत तीन वर्ष ५० टक्क्यापेक्षा कमी होत असेल त्याला पीक विमा योजनेचा लाभ देता येईल असे बोलले जाते. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी, रोग व किडीमुळे उत्पन्न नाहीसे झाल्यास याचे लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते. पीक विमा योजनेत सहभागी घेण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन करते. त्यामुळे कृषी विभागाचे धोरण असेल तर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास निश्चित पीक विम्याचा लाभ मिळेल अशी हमी देण्यात आली व कोणाला देण्यात आली त्यांची नावे जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करून सर्वच मालामाल झाले आहेत व होत आहेत. विमा कंपनीने शेतकऱ्यांकरिता आखलेली पीक विमा योजनासुद्धा कृषी विभाग, शासन व विमा कंपनीद्वारे लुबाडण्याचीच सुनियोजित योजना असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पीक विमा योजनेतून फसवणूक
By admin | Updated: September 9, 2014 00:40 IST