रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाकाळात कृषी अर्थव्यवस्था सर्वाधिक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून म्हटले जात होते. मात्र, निसर्गाने साथ सोडली आणि बोगस कंपन्यांनी शिरकाव केला. यामुळे कृषी अर्थव्यवस्था पार कोलमडली. त्यात भरीस भर म्हणून गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादक पट्ट्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त केले असून सरते वर्ष कृषी अर्थव्यवस्थेला ठप्प करणारे ठरले आहे. यवतमाळ जिल्हा निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सतत चर्चेत राहिला आहे. सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पीक विमा कंपनी मदतीला येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, विमा कंपनीने तकलादू धोरण राबवित शेतकऱ्यांची पार निराशा केली. जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचा पीकविमा उतरविला होता. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले. जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. याकरिता ३१४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. राज्य शासनाच्या निकषामध्ये मात्र जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर क्षेत्रच मदतीला पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे विमा कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही केवळ दहा हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. ऑनलाईन तक्रार दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांनाच ही मदत देण्यात आली. प्रत्यक्षात विमा कंपनीने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर २५ टक्के रक्कम तत्काळ देण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात त्या पद्धतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी काम पार पडले नाहीत. यामुळे साडेचार लाख शेतकरी वाऱ्यावर आहेत. आज त्यांना नुकसान झाल्यानंतरही मदत मिळाली नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले. पेरणीसाठीचा खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. यासोबतच कापूस उत्पादक पट्ट्यात गुलाबी बोंडअळीने चांगलाच कहर केला आहे. कापूस, सोयाबीन आणि आता तर तुरीचे पीकही हातातून जाण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक जिल्ह्यात येऊन पाहणी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र केंद्रीय पथक जिल्ह्याकडे फिरकलेही नाही.
सोयाबीन काढायचे कामच पडले नाही. बोंडअळीने फार वाईट परिस्थिती करून टाकली. आता पुढचा कारभार चालवायचा, कसा असा गंभीर प्रश्न आमच्यापुढे उभा झाला आहे. विमा कंपनीने आमची पार निराशा केली आहे. पेरणीचा खर्चही निघाला नाही. - विलास पाटील
या वर्षासारखे खराब वर्षे आजपर्यंत पाहिले नाही. अमाप खर्च झाला, हातात मात्र काहीच आले नाही. सोयाबीन गेले, कापूस गेला, तुरीवर आशा होती. मात्र, ती पण धुसर झाली आहे. विमा कंपनीने ७२ तासांत फोन करण्याचा अजब फतवा काढला. आम्हाला तो फोनही करता आला नाही. विमा काढून फायदाच झाला नाही. - शशांक बेंद्रे
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन मदत दिली जाणार होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आलीच नाही. कर्जमाफीचे पैसे अनेकांना भेटले नाही. आर्थिक परिस्थिती पार बिकट झाली आहे. - धनंजय मरपे