अकोला बाजार (यवतमाळ) : आकपुरी शिवारातील शेताच्या रस्त्यावर काट्या टाकल्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादात एकाने कुऱ्हाडीने दुसऱ्यावर हल्ला चढवला, कुऱ्हाडीचा वार जीव्हारी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी आकपुरी शिवारात घडली. सुधाकर महादेव बोटरे (४५) रा. धानोरा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आकपुरी शिवारात शेत गट क्रमांक ४६ व ४७ दरम्यान जाणाऱ्या रस्त्यावर रमेश शामराव कुळसंगे (४०) रा. गणेशपुर याने काट्या टाकून रस्ता बंद केला. याचा जाब विचारण्यासाठी सुधाकर बोटरे रमेशकडे गेले, यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला. रमेश कुळसंगे याने रागाच्या भरात हातातील कुऱ्हाडीच्या मागील बाजुने सुधाकरच्या छातीवर, पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी रमेश कुळसंगे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार विकास दांडे, पोलिस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे , नीलकमल भोसले करीत आहे. वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरा दिवसातील खुनाची ही दुसरी घटना आहे. यापुर्वी ३ जुन रोजी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत यावली (कारेगाव ) येथे पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली होती. अकोला बाजार येथे शुक्रवारी आठवडी बाजारात दोघांमंध्ये रक्त बंबाळ होईपर्यंत मारहाणीची घटना घडली. गुन्ह्याच्या घटना मध्ये सतत वाढ होताना दिसुन येत आहे. वडगाव पोलीस ठाण्यात विकास दांडे हे नव्यानेच ठाणेदार म्हणून रुजू झाले आहे. वाढती गुन्हेगारी, आणि अवैध धंदयावर वचक निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे.