आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:01:11+5:30
आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना बाधितांचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करीत आहे. या मोहिमेत आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र त्यांना कोरोना सारखे लक्षणे नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे.
जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसह परजिल्ह्यातून आलेले, परराज्यातून आलेले, परदेशातून आलेले अशा विविध बाबींची नोंद घेतली जात आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याची स्थिती काय आहे याबाबत अहवाल नोंदविला जात आहे.
आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे. यामुळे आता पुढील उपाययोजना आणि त्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला दिशा मिळणार आहे. या सर्वेक्षणात आठ हजार ७६६ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्याचे पुढे आले आहे.
ही लक्षणे वातावरण बदलामुळे असल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. यानंतरही या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप या आजारातील औषधांचे वितरण आरोग्य विभाग करणार आहे.
कोरोना सदृश्य लक्षणे इतर नागरिकांमध्ये दिसले नाही. मात्र त्यानंतरही दररोज आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना गावपातळीवर पाठविण्यात आल्या आहे. या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कुणाची प्रकृती खालावल्यास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे रुग्णांना हलविण्याच्या उपाययोजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर आरोग्यासंदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ आयसोलेशन वार्डात हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना केल्या जात आहे. पुढील काळात यामध्ये आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.
१९ हजार नागरिक निघाले परिघाबाहेर
परजिल्ह्यातून ३० हजार ८५७ व्यक्ती दाखल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे या शहरासह परराज्यातूनही आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. यामधील १९ हजार ९३८ व्यक्ती १४ दिवस होम क्वारंटाईन होत्या. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना परिघाबाहेर काढण्यात आले आहे. दहा हजार ९१९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. या व्यक्तींना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या व्यक्तींची १४ ही दिवस आरोग्य विभाग तपासणी करणार आहे. त्यांच्यात कुठले लक्षणे आढळली तर तत्काळ तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्या जाणार आहे.