स्वच्छ भारत मिशन : उद्दिष्टाच्या तीन टक्के शौचालय पूर्णयवतमाळ : जिल्हा परिषदेकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावागावात शौचालय निर्मिती केली जात आहे. २०१५ या आर्थिक वर्षात तब्बल ८५ हजार १२२ शौचालय निर्माण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित केले आहे. मात्र एप्रिल व जून या दोन महिन्यात केवळ ३.१७ टक्केच शौचालयाचे बांधकाम करता आले. शौचालय लाभार्थी यादी आॅनलाईन करावी लागत असल्याने या अभियानात खोडा निर्माण झाला आहे. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसचिव यांना प्रशासनाने सूचना दिल्या असून, शौचालय लाभार्थ्यांची यादी आॅनलाईन करण्यास सांगितले आहे. आॅनलाईन यादीत नाव असल्याशिवाय आता शौचालयाचा लाभ देता येणार नाही. ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीतील कॉम्प्युटर आॅपरेटरकरून ही यादी अपडेट करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहे. सध्या २ हजार ७०० शौचालय बांधून पूर्ण झाले आहे. यामध्ये राळेगाव तालुका अव्वल ठरला असून, येथे २०० शौचालय तयार करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्याची सरासरी २०० पेक्षा कमी आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ४४५ गावे पूर्णत: हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यातील १५ गावे याप्रमाणे २४० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. उर्वरित गावांमध्ये हागणदारी मुक्तीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहे. एकूण उद्दिष्टापैकी केवळ तीन हजार शौचालयाचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या व्यत्ययाने शौचालय निर्मितीचे काम आणखी थंडबस्त्यात जाणार आहे. जिल्ह्यात शौचालय निर्मितीचे उद्दीष्ट १०० टक्के पूर्ण व्हावे असा आटापिटा खुद्द जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडून सुरू आहे. यात अधिनस्थ यंत्रणेची कितपत साथ मिळते यावरच उद्दिष्टपूर्तीचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागात आरोग्य संवर्धानासाठी हागणदारीमुक्तीचा नारा दिला जात आहे. आता महिलांनीच पुढाकार घेतल्यामुळे या योजनेला अपेक्षित यश मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. तरीही अडथळ्यांची मालिका सुरूच आहे. शौचालय अनुदान हे १२ हजार रुपये करण्यात आले आहे. त्याउपरही आॅनलाईन यादीचा खोडा निर्माण झाला आहे. ही अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शौचालयाला आॅनलाईनचा खोडा
By admin | Updated: June 7, 2015 23:58 IST