जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:46+5:30
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १२७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी १०१ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. २२ मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी यशस्वी लढा दिला. शुक्रवार, २९ मेपर्यंत एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुंबई येथून काही दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील नागापूर येथे आलेल्या महिलेचा कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यू झाला. या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला गुरुवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी तिचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या महिलेची प्रकृती अतिशय बिघडली. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १२७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी १०१ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. २२ मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी यशस्वी लढा दिला. शुक्रवार, २९ मेपर्यंत एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता.
उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील ४२ वर्षीय महिला कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वी मुंबई येथून आली होती. गावात गेल्यानंतर नागापूर येथे यांना गावसमितीने शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले होते. या विलगीकरण कक्षातच महिलेची प्रकृती बिघडली. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. गुरुवारी २८ मे रोजी तिला कुटुंबीयांनी उमरखेड येथील खासगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी या महिलेला पुसदला नेण्याचा सल्ला दिला. पुसदच्या डॉक्टरांनी महिलेच्या आजाराची लक्षणे पाहून तिला कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यास सांगितले. कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल होताच महिलेमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळल्याने तिला गुरुवारी सायंकाळी यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पतीसह ही महिला यवतमाळ मेडिकलमध्ये आयसोलेशन वॉर्डात भरती झाली. या दोघाही पती-पत्नीचे नमूने तपासणीला पाठविले. त्यात दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर महिलेची प्रकृती अधिक खालावली. मेडिकलच्या डॉक्टरांनी उपचाराची शर्थ केली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीलाच या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिने वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सात जण कोरोनामुक्त
जिल्ह््यात गत दोन दिवसात काही रुग्णांची संख्या वाढली तर शनिवारी सात रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे त्यांना आयसोलेशन वार्डातून सुटी देण्यात आली. हे रुग्ण रुग्णालयातच संस्थात्मक विलगीकरणात राहणार आहे. यात हुडी एक, इसापूर दोन, रुई तलाव एक, निंबी दोन आणि माळेगाव पार्डी अशा सात जणांचा समावेश आहे.
‘त्या’ मृत महिलेच्या संपर्कात आले होते २५ जण
उमरखेड तालुक्यातील नागापूर येथे ज्या शाळेत ही महिला थांबली होती तेथे २५ जण तिच्या संपर्कात आले. यात तिच्या कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. संपर्कातील २१ जणांना मरसूळ येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये, तर कुटुंबातील सदस्यांना पुसद येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवले आहे. हे सर्वजण मुंबईवरून सोबतच प्रवास करत आले. आता या सर्वांची पुन्हा चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले.