गजानन अक्कलवार कळंबअज्ञात आजाराने संत्र्याचा रंग बदलला. आकारही अतिशय लहान आहे. चवही बदलली. त्यामुळे संत्र्याला व्यापारी आणि ग्राहकांकडूनही अपेक्षित मागणी नाही. नासाडी होऊ नये म्हणून संत्रा अतिशय कमी किमतीत विकावा लागत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे.तालुक्यात शेकडो हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. यापूर्वी संत्रा बागेतून चांगले उत्पन्न मिळत होते. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे वळले. यावर्षी संत्र्याला अजीबात मागणी नाही. संत्र्यावर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. हा रोग पहिल्यांदाच आल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. या रोगामुळे संत्रा फळ लालसर तांबडे येते व गळून पडते. बहुतेक झाडांवर हा रोग आलेला आहे. अनेकदा फवारणी करूनही उपयोग होत नाही. कृषी विभागाकडूनही कुठलेही मार्गदर्शन मिळालेले नाही. त्यामुळे हा रोग कसा परतवून लावावा, हा प्रश्न संत्रा उत्पादकांसमोर आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने फळ आकाराने लहान आहे. यापूर्वी आंबीया व मृग बाराचे संत्र धरायला लागताच व्यापारी बगीच्याचा सौदा करायचे. यावर्षी संत्रा तोडायला आल्यानंतरही व्यापारी फिरकायला तयार नाही.खरिपाने दगा दिल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या आशा फळबागांवर होत्या. मात्र संत्रा आणि इतर फळांचेही उत्पन्न समाधानकारक तर दूर कुटुंबाचा गाडा हाकला जाईल एवढेही झालेले नाही. रबीच्या पेरणीसाठीही अनेकांना कर्जाऊ रकमा घ्याव्या लागल्या. या कर्जाची परतफेड कशाप्रकारे करायची, ही चिंताही शेतकऱ्यांना लागली आहे.
रंग व चव बदललेल्या संत्र्याला उठावच नाही
By admin | Updated: December 9, 2015 03:04 IST