यवतमाळ : महसूल विभागाच्या कामकाजाला गती मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी १ आॅगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात ई-भूमी अभियान राबवायला सुरूवात झाली. गाव पातळीवर कामकाजाला गती देण्यासाठी हे अभियान राबविण्याचा गवगवा करण्यात आला. त्यामध्ये आठ उपविभाग आणि १०१ मंडळ कार्यालयाच्या निर्मितीनंतर दस्तावेज संगणकीकृत केल्या जाणार होते. मात्र आजतागायत हे काम पूर्ण झाले नाही. असे असले तरी महसूल प्रशासनाकडून प्रगतीपथाचा कित्ता गिरविला जातो. एवढेच नव्हे तर गाव पातळीवर आजही पर्जन्यमापक यंत्र पोहोचले नाही हे विशेष.यवतमाळ जिल्ह्यात तीन नवीन महसूली उपविभाग निर्माण करण्यात आले. दोन तालुके मिळून एक उपविभाग निर्माण करण्यात आला आहे. तर तीन ते चार साजेमिळून एक मंडळ कार्यालय असे १०१ मंडळ कार्यालय तयार झाले. या ठिकाणावरून संपूर्ण कामकाज सुरू झाले आहे. तेव्हापासूनच तलाठ्यांचे दफ्तर संगणकीकृत व्हावे यासाठी ई-महाभूमी अभियानाच्या माध्यमातून ई-मोजमाप, ई-फेरफार, ई-अभिलेख, गाव नकाशांचे डिजीटलीकरण आॅनलाईन नोंदविले जाणार होते. संपूर्ण दफ्तरच संगणकीकृत झाले तर जमीनीचे अचूक क्षेत्रफळ आणि जुना नकाशा योग्य आहे का याची अचूक माहिती मिळणे शक्य होणार होते. तलाठ्याकडे असणाऱ्या २१ नोंदी आॅनलाईन करण्यात येणार होत्या. शिवाय ही माहिती संकेतस्थळावर टाकली जाणार होती. मात्र ई-भूमी अभियानाला प्रारंभ होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडे विचारणा केली असता संगणकीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. मात्र बोटावर मोजण्या इतके महसूली उपविभाग सोडले तर बहुतांश ठिकाणी संगणकीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. या अभियानातच गावपातळीवर पर्जन्यमापी यंत्र दिले जाण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या पर्जन्यमापी नेमक्या गेल्या कुठे याचाही थांगपत्ता नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
संगणकीकृत दफ्तराचे महसूलात भिजत घोंगडे
By admin | Updated: January 11, 2015 22:56 IST