वणी तालुक्यात तीन वर्षांत ८२ बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:37+5:30
वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यात गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते एक वर्षे वयोगटातील ८५ बालमृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ३२ बालमृत्यू सन २०१७-१८ मध्ये झाले आहेत.
वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते. मात्र अनेकदा असे वातावरण मिळत नाही. हायपो ग्लासीमीया, न्युमोनिया यासारख्या आजाराची बाधा नवजात बालकाला होते. त्यातून अनेकदा मृत्यू ओढवतो. सन २०१७-१८ या वर्षात वणी तालुक्यात तब्बल ३२ बालमृत्यू झालेत. सन २०१८-१९ मध्ये २६ बालमृत्यू झालेत, तर सन २०१९-२० (एप्रिल १९ ते डिसेंबर १९) या वर्षात २४ बालमृत्यू झाले. एकूण आकडेवारीवर नजर फिरविल्यास मागील वर्षात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.
वणी तालुक्यात शिरपूर, कायर, कोलगाव व राजूर कॉलरी अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु रिक्तपदांमुळे ही आरोग्य केंद्र पांगळी झाली आहेत. चारपैकी कोलगाव व कायर येथे सर्वाधिक प्रसुती केली जाते. परंतु चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.
कोलगाव आरोग्य केंद्रात १ औषध निर्माण अधिकारी, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ कनिष्ठ लिपीक, १ नेत्र चिकीत्सा सहाय्यक, चार आरोग्य सेवक (पुरूष), पाच आरोग्यसेवक (महिला), १ वाहनचालक, तीन परिचर अशी १७ पदे रिक्त आहेत. उर्वरित तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अशीच अवस्था आहे. कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ पदे मंजूर असली तरी त्यातील तब्बल २० पदे रिक्त आहेत. उर्वरित दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेच हाल आहेत. कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णांना हवी तशी आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.
वणी तालुक्यात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असल्याने त्याचाही परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. या भागात कोळसा खाणी असल्याने कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे कोळशाची धूळ सदैव वातावरणात पसरत असते. त्यातूनच अनेक बालकांना जन्मताच दमा या आजारांची बाधा होत आहे.
८४ अर्भकांचा उदरातच झाला मृत्यू
वणी तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण जसे अधिक आहेत. तसेच कमी दिवसात प्रसुती होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यातून गेल्या तीन वर्षांत ८४ अर्भकांचा मातेच्या उदरातच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.