राजापूर - तालुक्यातील प्रस्तावित नाणार पेट्रो केमिकल रिफायनरी विरोधात १४ गावातील हजारो लोक आक्रमक झाले आणि आज पुन्हा एकदा रिफायनरीविरोधात ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. राजापूरच्या डोंगर तिठा येथे १४ गावातील प्रमुख मंडळी यांनी एकत्र येत सरकार विरोधात घोषणाबाजी केली तसेच ज्या शेतकऱ्यांनी नाणार प्रकल्पासाठी जमिनी दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली त्या शेतकऱ्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत असा थेट सवाल करत मुख्यमंत्री थेट खोटं बोलत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ज्यांनी संमती दिली आहे, असे सगळे शहा, मोदी आणि मेहताच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. जमीन आमच्या हक्काची आहे त्यामुळे आम्ही याठिकाणी सरकारला पाऊलही ठेऊन देणार नसल्याच्या घोषणेचाआज ग्रामस्थांनी पुनरुच्चार केला आहे.