खरीप हंगामात जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यानुसार, गतवर्षीच्या हंगामातही लाखो क्विंटल उत्पादन झाले, मात्र सुरुवातीला अल्प दर मिळाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर कालांतराने तब्बल ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले. शेतकऱ्यांकडे सोयाबीनच शिल्लक नसल्याने या दरवाढीचा त्यांना फायदा झाला नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रारंभी काही प्रमाणात सोयाबीन खरेदी करून ठेवल्याने त्यांचा थोडाफार फायदा झाला, तर काही मोठ्या शेतकऱ्यांनाही दरवाढीचा लाभ मिळाला. सध्या मात्र सोयाबीनचे दर घसरू लागले आहेत. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी सोयाबीनला सरासरी ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याचे दिसून आले.
...................
कोट :
सोयाबीनची दरवाढ होण्यापूर्वीच मालाची विक्री केली होती. त्यामुळे विशेष फायदा झाला नाही. आता लवकरच सोयाबीनचा नवा माल विक्रीसाठी येणार आहे; मात्र आतापासूनच दर कमी होत आहेत. ते यापुढे अधिकच घसरण्याची शक्यता असून यंदाही जेमतेम दरानेच सोयाबीन विक्री करावे लागणार आहे.
- प्रदीप इढोळे
.........
या वर्षी चांगले पर्जन्यमान व अनुकूल वातावरणामुळे सोयाबीनपासून विक्रमी उत्पादन हाती पडण्याची शक्यता आहे. असे असताना आतापासून सोयाबीनचे दर घसरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विशेष फायदा होणार नसल्याची एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे.
- अतुल कुटे